देशभरात मे महिनाही उष्णतेच्या तडाख्याचा
पुणे – सध्या देशभरात उष्णतेची लाट आली असून, तापमानाने 122 वर्षांचा विक्रम मोडल्याची नोंद हवामान विभागाने घेतली आहे. वायव्य भारत आणि मध्य भारतात अनुक्रमे 35.9 आणि 37.7 अंश सेल्सिअस सरासरी कमाल तापनाची नोंद झाली आहे. हे प्रमाण मागील 10 वर्षांच्या तुलनेत सरासरी तब्बल 3 अंशांनी जास्त आहे.
हवामान विभागाने शनिवारी एप्रिलमधील हवामानाचा आढावा घेतला आणि मे महिन्यातील हवामानाचा अंदाज जाहीर केले. त्यानुसार देशातील पश्चिम मध्य, उत्तर पश्चिम आणि पूर्वोत्तर भारतात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज आहे. तर, उर्वरित भारतात सरासरी किंवा सरासरीपेक्षा कमी राहणार आहे.
देशातील बहुतांश भागात मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांसाठी एप्रिल महिना तापदायक ठरला होता. काही जिल्ह्यांत तर 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात मेच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
देशातील सरासरी कमाल तापमानाची नोंद : वर्ष 2010 – 35.42 अंश सेल्सिअस : 2016 – 35.32, 1973 – 35.30, 2022 – 35.05, 1980 – 35.04, देशातील सरासरी किमान तापमानाची नोंद : 2010 – 29.48, 2016 – 29.32, 1973 – 29.16, 2022 – 29.10, 1980 – 29.02