नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यामुळे आतापर्यंत ३७९ जागांसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोप देण्यासाठी आता केवळ ३ आठवडे उरले आहेत, असा दावा कॉंग्रेसने केला.
चौथ्या टप्प्यासाठी मतदान झाल्यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली. भाजप दक्षिण भारतातून साफ आणि उत्तर, पश्चिम, पूर्व भारतातून हाफ होणार असल्याचे बिल्कूल स्पष्ट झाले आहे. मोदींच्या चेहऱ्यावरील धास्ती स्पष्टपणे दिसून येत आहे.
प्रत्येक टप्प्यानंतर ते अधिकच हताश आणि निराश दिसत आहेत. यावेळच्या निवडणुकीत भाजप आणि मोदींचा कुठलाही सकारात्मक प्रचार आढळत नाही. निवडणुकीचा अजेंडा पूर्णपणे इंडिया आघाडी, कॉंग्रेस आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सेट केला आहे.
आता कुठलीही सुप्त लाट नसून इंडिया आघाडीला अनुकूल लाट आहे. ४ जून जवळ येत आहे, असे म्हणत त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस नजीक येत असल्याकडे लक्ष वेधले.