आंबेगाव तालुक्यातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप
मंचर – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर, पोंदेवाडी, लाखनगाव, देवगाव, पारगाव, शिंगवे, जारकरवाडी परिसरात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप आले आहे. या पाण्याचा उपयोग शेतकरी बीट धुण्यासाठी करीत आहेत.
पावसामुळे अनेक तरकारी पिके सडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे वाड्या-वस्त्यांना जोडणारे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. सध्या या रस्त्यांवरुन पाणी वाहत आहे. रस्त्यांची झालेली ही वाईट परिस्थिती येथील नागरिकांना त्रासदायक ठरत असून, रस्त्यावर पाणी जमा झाल्यामुळे नागरिकांना चालतानाही अडथळा येत आहे. परतीच्या पावसाला नागरिक वैतागले असून पाऊस थांबावा, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.
जोरदार झालेल्या पावसामुळे मोठा आर्थिक भुर्दंड शेतकरी वर्गाला बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी काठापूरचे माजी उपसरपंच अनिल जाधव व कान्हु करंडे यांनी केली आहे.