मुंबई, दि. 11 – राज्यात केरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने काही जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण, करोनाबाधित रुग्णांची संख्या आणखी वाढत राहिली तर जिथे गरजेचा वाटेल त्या ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील जे जे रुग्णालयात करोना प्रतिबंधक लस घेतली. लस घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना महाराष्ट्रातील जनतेनेही लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, करोनाचा धोका वाढत असल्याने ज्यांना-ज्यांना करोनाची लस घेण्यासाठी पात्र ठरवले आहे, त्यांनी कोणतीही भीती न बाळगता लस घ्यावी. लस नोंदणीसाठी थोडा गोंधळ निर्माण झाला होता. पण आता अडचण दूर करण्यात आली आहे, लस सर्वांनी घ्यावी.
दुसरीकडे कदाचित काही ठिकाणी लॉकडाउन लागू करावा लागणार आहे.
म्हणून माझी सर्व लोकांना विनंती आहे की, लसीकरण करून घ्या, अनावश्यक गर्दी करू नका, मास्क वापरा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, करोनाचे सर्व नियमांचे पालन करा, जर कुठे नियमांचे पालन केले जात नसेल तर काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन लावावा लागणार आहे. एक-दोन दिवसांमध्ये बैठक घेणार आहोत, त्यानंतर लॉकडाउनचा कडक निर्णय घ्यावा लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतल्या जे जे हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत कोव्हॅक्सिन लस घेण्यात आली आह. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मीनाताई पाटणकर अशा तीन जणांना लस देण्यात आली आहे. याआधीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कुटुंबासह कोविडशिल्ड लस घेतली आहे.
नागपूरमध्ये कडक संचारबंदी
करोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता प्रशासनाने 15 ते 21 मार्च 2021 दरम्यान नागपुरात लॉकडाऊन लागू केला आहे. याबाबतची घोषणा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली. यावेळी त्यांनी नागरिकांना कारणाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. नागपूरमध्ये 15 ते 21 मार्च दरम्यान कडक संचारबंदी लागू करण्यात येणार असून, नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत हे लॉकडाऊन लागू केले जाणार आहे. नागपूर महानगरपालिका हद्दीसह कामठी, हिंगणा आणि वाडी हे तीन भाग पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत आहेत, याठिकाणी देखील लॉकडाऊन असणार आहे.