नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागांमध्ये देखील करोना रुग्ण आढळून येत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झालंय. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये लॉक डाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर काही जिल्ह्यांमध्ये करोना संबंधीचे निर्बंध कडक करण्यात आलेत. अशातच आता आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी महाराष्ट्रातील करोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढण्यामागे नक्की काय कारण आहे? याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत बोलताना भार्गव यांनी, “महाराष्ट्रातील करोना रुग्णसंख्या वाढण्यामागे करोना विषाणूचा नवा स्ट्रेन असल्याचं आढळून आलेलं नाही. रुग्णसंख्या वाढीमागे कमी करण्यात आलेली करोना चाचण्यांची संख्या, बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग न करणे, करोनाबाबतचे नियम न पाळणे व मोठ्या संख्येने एकत्र जमणे ही कारणे आहेत.” असं सांगितलं.
Maharashtra has shown a worrisome trend. The mutant strain has not been found incriminating in this surge in cases. It is just related to reduced testing, tracking & tracing and COVID inappropriate behaviour and large congregations: ICMR DG Dr Balram Bhargava pic.twitter.com/BhrkiF1cQB
— ANI (@ANI) March 11, 2021
तत्पूर्वी, महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने राज्य सरकारने आजच नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या १५ तारखेपासून २१ तारखेपर्यंत लॉक डाऊन करण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय. रुग्णसंख्या वाढीस लागल्याने राज्य सरकारने येत्या रविवारी (दिनांक १४ मार्च) होणारी राज्यसेवेची परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय देखील घेतला आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस मुंबईतील जेजे रुग्णालयामध्ये जाऊन घेतला. लस घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यानी राज्यातील जनतेला करोना लस घेण्याचे आवाहन केले. तसेच मुख्यमंत्र्यानी परिस्थितीचा आढावा घेऊन लॉक डाऊन संदर्भातला निर्णय येत्या दोन दिवसांमध्ये घ्यावा लागेल असं देखील सांगितलं.