पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप केले. त्यांनी स्वत:कडे गृह खाते कायम ठेवले आहे. मात्र, अर्थ खात्याची जबाबदारी भाजपकडे सोपवली आहे. नितीश यांनी नुकतीच महाआघाडीची साथ सोडत भाजपशी पुन्हा मैत्री केली. त्यामुळे बिहारमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले. नितीश यांच्या व्यतिरिक्त आठ मंत्र्यांनी शपथ घेतली. आता नव्या मंत्र्यांकडे विविध खात्यांचा प्रभार सोपवण्यात आला आहे.
नितीश यांनी गृह खाते स्वत:कडेच ठेवल्याने त्यांचे पोलीस दलावर नियंत्रण राहील. याआधी महाआघाडीचे सरकार असताना नितीश यांच्या जेडीयूकडे अर्थ आणि आरोग्य या खात्यांची जबाबदारी होती. आता ती भाजपकडे सोपवण्यात आली आहेत. त्यानुसार, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे अर्थ आणि आरोग्य खात्यांचा प्रभार सांभाळतील. भाजपचेच नेते असणारे दुसरे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांच्याकडे कृषी, रस्ते बांधकाम, महसूल, जमीन सुधारणा आदी खाती सोपवण्यात आली आहेत. याआधी जेडीयूसमवेत सत्तेत असतानाही भाजपकडे अर्थ आणि आरोग्य ही खाती होती.
नव्या मंत्रिमंडळातील भाजपचे तिसरे मंत्री प्रेम कुमार सहकार, इतर मागासवर्ग आणि अतिमागासवर्ग कल्याण, पर्यटन, पर्यावरण आदी खात्यांचे कामकाज पाहतील. जेडीयूच्या तीन मंत्र्यांच्याही खात्यांचे वाटप करण्यात आले. त्याशिवाय, हिंदुस्थानी अवाम मोर्चाच्या एकमेव आणि अपक्ष आमदार असणाऱ्या एका मंत्र्याचेही खाते निश्चित करण्यात आले.