Chagan Bhujabal on Maratha Survey – ओबीसी एल्गार मोर्चाचे आज अहमदनगर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओबीसी समाजाचे नेते व कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी स्फोटक भाषण केले. सरकारच्या आदेशावरून सुरु करण्यात आलेली मराठा समाजाच्या सर्वेक्षणाची मुदत शुक्रवारी संपली आहे.
प्रशासनातर्फे ९० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अशातच छगन भुजबळ यांनी मात्र या सर्वेक्षणावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
अहमदनगर येथे झालेल्या सभेमध्ये छगन भुजबळ यांनी, सर्वेक्षणामध्ये कर्मचाऱ्यांकडूनच खोटी माहिती भरली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ? । Chagan Bhujabal on Maratha Survey
सर्वेक्षणामध्ये १८० प्रश्न आहेत, एका घराचे सर्वेक्षण करण्यासाठी १ ते १.५ तास लागतो असं असताना एका दिवसामध्ये कर्मचारी २५ ते ५० घरांचे सर्वेक्षण केल्याचं कसं सांगतात? असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. याबाबत पुढं बोलताना भुजबळ यांनी, १८० प्रश्नांपैकी केवळ जात विचारली जाते. बाकीचे प्रश्न कर्मचाऱ्यांकडून कार्यालयातच भरले जातात.
बंगला असला तरी झोपडी, शिक्षण असलं तरी मी शिकायला गेलो नाही, गाडी असली तरी काही नाही, अशी सर्व खोटी माहिती भरली जाते, असे गंभीर आरोप भुजबळ यांनी यावेळी बोलताना केले.
https://facebook.com/edainikprabhat/posts/pfbid09t7i74xSHKUAp7L6PFEv9CiNpNq4tFzAky2bC3AQ2wsXkTq82QiEMXP8EZBmuiBol
दरम्यान, छगन भुजबळ यांनी केलेल्या या आरोपांमुळे शिंदे – फडणवीस – पवार सरकार अडचणीत येणार असल्याचे कयास राजकीय वर्तुळात बांधण्यात येत आहेत.
भुजबळ विरुद्ध सरकार, वाद चिघळणार?
छगन भुजबळ यांनी शनिवारी झालेल्या सभेतून देखील आपल्याच सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. काही दिवसांपूर्वीच भुजबळ सरकारविरोधात घेत असलेल्या भूमिकांवरून संजय गायकवाड यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. भुजबळ यांना, कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळाबाहेर काढा असे गायकवाड म्हणाले होते.
अशातच भुजबळ यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात भूमिका घेत, आपल्याच सरकारतर्फे करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने मंत्रिमंडळात भुजबळ एकाकी पडणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.