मुंबई – स्वत:ला निस्वार्थी जनसेवक म्हणवून घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी एकाच वेळी पाच ते सहा सरकारी बंगले आपल्या ताब्यात ठेवले आहेत असा आरोप शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आला आहे. या मुखपत्रातील रोखठोक सदरात शिवसेनेने म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या काळात राज्यातील मंत्री म्हणून त्यांनी नंदनवन हा बंगला ताब्यात घेतला. नंतर शेजारचा आणखी एक बंगला ताब्यात घेऊन नंदनवनचा त्यांनी विस्तार केला.
आपण याच नंदनवन मधून कारभार पाहू अशी घोषणा त्यांनी केली होती. पण ते आता वर्षावरही मुक्कामाला गेले आहेत. आता तेथे कार पार्किंग आणि भेटायला येणाऱ्यांची सोय म्हणून अग्रदुत आणि तोरणा हे बंगलेही त्यांनी ताब्यात घेतले आहेत. आता तर ते त्याही पुढे गेले असून त्यांनी पक्ष कार्यालयास जागा हवी म्हणून मंत्रालयापुढील ब्रम्हगीरी या सरकारी बंगल्याचाही त्यांनी ताबा घेतला आहे असा दावा या सदरातून करण्यात आला आहे.
अंधेरी पोटनिवडणूक: भाजप उमेदवार अर्ज मागे घेणार की नाही? उद्या होणार स्पष्ट
निस्वार्थी व्यक्ती एकाच वेळी पाच ते सहा बंगल्यांवर ताबा ठेवते हा महाराष्ट्रातील विक्रम आहे असेही शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेचा काटा काढण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांचा कॉन्ट्रॅक्ट किलर सारखा वापर सुरू केला असून कॉन्ट्रॅक्ट किलरचा राजकीय अंतही वाईट होतो असा इशाराही त्यांना देण्यात आला आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही, शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी स्वत:ला सावरावे अशी समजही त्यांना शिवसेनेने दिली आहे. उद्धव ठाकरे हे मंत्रालयात जात नव्हते असा आरोप भाजप आणि शिंदे गटाकडून सातत्याने करण्यात येत होता, पण आता स्वत: शिंदे हेच आठ दिवसांतून एकदाच मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात जात असल्याचे स्पष्ट झाल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.