मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचे नाटक आता शेवटच्या अंकाकडे वळताना दिसत आहे. त्यातच आता मोठ्या शत्रूला दूर ठेवण्यासाठी छोट्या शत्रूला जवळ केले असल्याचे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केले आहे. महाराष्ट्रात भाजपाची ताकद कमी करायची असेल तर शिवसेनेसोबत सरकार स्थापन कऱणे गरजेचे आहे असेही अबू आझमी यांनी म्हटले आहे. महाविकासआघाडीचं मुस्लिमांना आरक्षण देऊ शकतं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद कमी करायची असेल तर शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलेच पाहिजे. जर आम्ही सरकार स्थापन केले नाही तर भाजपा संधी साधून सरकार स्थापन करेल, असे अबू आझमी यांनी सांगितले आहे. तसंच भिवंडीत शिवसेना कॉंग्रेससोबत काम करत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. काही गोष्टींसाठी शिवेसनेचं मन वळवावं लागणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास कॉंग्रेस नेतृत्वाने अखेर मान्यता दिली. कॉंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी झालेल्या पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिवसेनेशी आघाडी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे कॉंग्रेसच्या बैठकीत सांगण्यात आले.