दहिवडी – सातारा दहिवडी नगरपंचायत हद्दीत गेल्या काही दिवसांपासून विविध साथीच्या रोगांनी नागरिकांना पछाडले असून आजवर शहरातील बहुतांशी खाजगी दवाखान्यात साथीच्या रोगाची शिकार बनलेले शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. साथीच्या आजाराने जनता हैराण झाली असून याबाबत नगरपंचायत प्रशासन मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे, मात्र तरीही आरोग्य विभागाकडून या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतेही उपाय राबवले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र या सर्व प्रकारात स्वच्छता ठेकेदारांचे फावले आहे तर टक्केवारी घेणारे काही अधिकारी देखील “तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशीच भूमिका पार पाडत आहेत.
माण तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकावर लोकसंख्या असलेले शहर असून याठिकाणी नगरपंचायत झाल्यापासून शहरात काय चालू आहे हेच नागरिकांना समजत नाही. नगरपंचायत हद्दीतील बहुसंख्य नागरीक हे चिकुनगुण्या, डेंग्यू, मलेरियासारख्या आजाराने ग्रासल्याने आपल्यावर उपचार करुन घेत आहेत. शहरात गत काही दिवसांपासून डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. या डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेचे प्रयत्न तोकडे पडल्यानेच आज शहरात विविध साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. विविध साथीने त्रस्त जनता आरोग्य केंद्राचा आरोग्य विभाग काय झोपा काढतोय काय? असा संतप्त सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
नगरपंचायत क्षेत्रफळ मोठे असलेल्या या शहराला अनेक वाड्यावस्त्यानी जोडले गेले आहे. भवानवाडी, डबरमळा, भटकी, तुपेवडी, सावंत वस्ती, मोरेमळा, रानमळा, शिंदेमळा, असे सगळे मिळून अकरा प्रभाग गावा भाहेर आहेत. या ठिकाणी स्वच्छता कधीच करण्यात आली नाही, राहिलेल्या शहरातील 6 प्रभागाची स्वच्छता ठेकेदार करत नसेल तर नगरपंचायतीकडून ठेकेदारांवर 35 ते 40 लाखांची उधळपट्टी का केली जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी परिपूर्ण गटारे असणे गरजेचे असून या भागातही कर्मचाऱ्याऱ्यांना पाठवून तुंबलेल्या गटारांची साफसफाई व अनेक ठिकाणचा कचरा अनेक दिवस पडून आहे तरी यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
नगरपंचायतमधील मुख्यधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांची स्वच्छता ठेकेदार यामधील असणारी आर्थिक साखळीमुळे नागरिक साथीच्या रोगाचे शिकार बनलेले आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून तात्काळ चौकशी करावी अन्यथा नागरिकांच्या जीवाशी असाच खेळ चालूच राहील.
– अशोक जाधव, नागरिक दहिवडी