मुंबई – राष्ट्रपती राजवटीनंतर शिवसेना व कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचा सत्ता स्थापनेला वेग आला आहे. महाशिवआघाडीचे सरकार बनविण्याचा निर्णय निश्चित झाला असला तरी अद्यापही भाजप-शिवसेना युती तुटल्याचे कोणत्याही पक्षाने अधिकृतपणे सांगितलेले नाही. कदाचित युतीचा पोपट मेला आहे हे कोणी जाहीर करायचं हा प्रश्न असू शकतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.
जयंत पाटील म्हणाले कि, कदाचित पोपट मेला आहे हे कोणी जाहीर करायचं हा प्रश्न असू शकतो. आम्ही कोणतीही अट घातली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका विरोधी पक्षात बसण्याची होती. मात्र राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर शिवसेनेकडून आम्हाला अधिकृत प्रस्ताव आला त्यानंतर ही चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेसोबत आमची चर्चा सुरु आहे. सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी बैठक सुरु आहे. आमच्या दोघात एकवाक्यता आहे. किमान समान कार्यक्रमावर चर्चा होईल. त्यानंतर आम्ही शिवसेनेशी बोलणी करु, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सरकार स्थापन करण्यापूर्वी दोन्ही कॉंग्रेसमध्ये किमान कार्यक्रम ठरविण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांचा समावेश आहे. तर कॉंग्रेसने जाहिर केलेल्या समितीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार व माणिकराव ठाकरे यांचा समावेश आहे.