सुरेश डुबल
तीन महिन्यांत दोन जणांच्या मृत्यूने शहरात खळबळ; ठोस उपाययोजनांची आवश्यकता
कराड – येथील बुधवार पेठ परिसरात डेंग्यू व डेंग्यू सदृश रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आंबेडकर क्रीडांगणावर गवत व घाणीचे साम्राज्य वाढले असून स्वच्छता सर्वेक्षणात प्रथम क्रमांक मिळवल्याचा डंका पिटणारी नगरपालिका या परिसरातील स्वच्छतेच्या बाबतीत मात्र उदासीन असल्याचे दिसून येत आहे. येथील अस्वच्छतेमुळे नुकताच नऊ वर्षाच्या सोनाक्षी चा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर संतापजनक बाब म्हणजे तेथील सुमारे पंधरा ते वीस जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे.
कराड नगरपालिकेने 2018 व 19 या दोन वर्षात स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग घेतला. या दोन्ही वर्षात पालिकेला पुरस्कारही मिळाला. मात्र खरच कराड स्वच्छ आहे का? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. कारण गेल्या तीन महिन्यात शहरातील दोघांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे.
मंगळवारी नऊ वर्षांच्या सोनाक्षीच्या मृत्यू झाला. तर तीन महिन्यांपूर्वी दर्गा मोहल्ला येथील दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. सध्या शहरात साधारणत: पंधरा ते वीस पेक्षा जास्त जण डेंग्यूूच्या विळख्यात सापडले आहेत. तर काही लोकांना डेंग्यूूची लक्षणे जाणवू लागली आहेत. असे असले तरी कराड नगरपालिका मात्र झोपेचे सोंग घेऊन व स्वच्छ भारत अभियानात प्रथम क्रमांक आलेल्या आनंदातून अजूनही बाहेर पडलेली नाही.
फक्त कचरा उचलला, त्याची विल्हेवाट लावली म्हणजे स्वच्छता नव्हे. हे पालिकेला कोण सांगणार? असा देखील प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घेतलेल्या स्पर्धांच्या वेळी शहरातील गटारे, सांडपाणी यांची योग्य विल्हेवाट लावली जात होती. मात्र जसा पालिकेला पुरस्कार मिळाला, त्यानंतर या स्वच्छतेकडे पालिकेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचे दिसते.
अशी कुठली डेंग्यू किंवा अन्य कुठल्या साथीचे रोग पसरू लागले की मग गटार साफ करणे, औषध फवारणी करणे, पावडर टाकणे असे दाखवून आम्ही स्वच्छतेसाठी किती आग्रही आहोत, हे शहरवासीयांना दाखवली जाते. मात्र इतर वेळी हे होताना दिसत नाही. पुरस्कार मिळवा त्याचा आनंदच होईल, मात्र पुरस्कारानंतर देखील खरी स्वच्छता कशी राहील, ही पालिकेची खरी जबाबदारी आहे. मात्र पालिका ती घेताना दिसत नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.
कराड नगरपालिकेने शहर कचरा कोंडाळे मुक्त केले, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली, ठिकठिकाणी स्वच्छ शहरांच्या भेटी घेतल्या. अभ्यास दौरे केले. मात्र तरीही शहरात डेंग्यू सारखे रोग पसरत असतानाही नगरपालिका मूग गिळून गप्प बसत असेल तर त्या अभ्यास दौऱ्याचे फलित काय? असाही प्रश्न नागरिक करु लागले आहेत. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पुरस्कार मिळाले मात्र, त्यानंतर यामध्ये सातत्य न राहिल्याने कराड नगरपालिका शहरात डेंग्यू सारख्या आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या मृत्यूस पालिका कारणीभूत आहे, असा सूर शहरवासीयांकडून उमटू लागला आहे.
येणाऱ्या काळात डेंग्यूसारख्या आजारावर कायमस्वरूपी उपाय काढावयाचा असेल, तर स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये रोल मॉडेल असणाऱ्या गावांमध्ये ज्या पद्धतीच्या सोयीसुविधा वापरल्या जातात. त्या कराडमध्ये वापरणे गरजेचे आहे. अन्यथा स्वच्छ सर्वेक्षण, स्वच्छ भारत अभियानावरुन जनतेचा विश्वास उठेल, एवढी भयानक अवस्था कराड शहराची झालेली आहे.