पाथर्डी -तालुक्यातील क्षेत्र मढी येथे शेकडो वर्षांची परंपरा असलेली गोपाळ समाजाची मानाची होळी तणावपूर्ण वातावरणात पेटली. पोलिसांना चकवा देत गडाकडे जाणारा पारंपरिक मार्ग मानकऱ्यांनी अचानक बदलल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत मूळ मार्गाकडे वळवले. त्यामुळे तणाव निवळण्यास मदत झाली. होळी पेटल्यानंतर एक तासाने दोन गटांत हाणामारी होऊन एका गटाने दुसऱ्या गटावर अचानक हल्ला केला. पोलिसांनी धाव घेताच हल्लेखोर पळून गेले.
चैतन्य कानिफनाथ मंदिर बांधण्याला गोपाळ समाजाने खूप मोठी मदत केल्याने गावची सार्वजनिक होळी पेटवण्याचा मान त्या समाजाला देऊन स्थानिक ग्रामस्थ आज होळी करत नाहीत. मानकरी यांचा पारंपरिक मार्ग ऐनवेळी बदलल्याने पोलीस यंत्रणांची धावपळ उडाली. पोलिसांनी वेळेस सतर्क होत मानकरी यांना गडाच्या पायथ्याशी रोखले.
त्यांनतर पाच मानकऱ्यांना पोलीस बंदोबस्तात कानिफनाथ गडावर नेले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी कडक भूमिका घेत जे मानकरी हजर असतील त्यांनाच गोवऱ्या दिल्या जातील, अशी आक्रमक भूमिका घेतली. नाथांच्या समाधीचे दर्शन घेऊन देवस्थान समितीच्या वतीने मानकऱ्यांना गोवऱ्या देण्यात आल्या. मानाच्या गोवऱ्या घेत त्या डोक्यावर ठेऊन कानिफनाथांच्या समाधी मंदिराला प्रदक्षिणा घातली.त्यानंतर गडाच्या पायथ्याला साखर बारवेजवळ पोलीस बंदोबस्तात पाच मानकरी येऊन होळी पेटविण्यात आली. होळी पेटवताना होळीच्या बाजूने बसून तणाव निर्माण करणाऱ्यांना पोलिसांनी खाक्या दाखवत बाजूला केले. त्यानंतर नामदेव माळी, माणिक लोणारे, हरिभाऊ गव्हाणे (हंबीराव), रघुनाथ काळापहाड, भागीनाथ नवघरे, ज्ञानदेव गिऱ्हे या गोपाळ समाजाच्या मानकऱ्यांनी होळी पेटवली.