प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 -पुणे महापालिकेचे विभाजन करून दोन महापालिका करण्याचा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारसमोर नाही. नवनवीन वादाचे विषय काढू नका, अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या विभाजनाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. याशिवाय, मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविणार नाही तसेच पुण्याचा पालकमंत्रीही होणार नाही, असे सांगत आपल्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर पडदा टाकला. एका कार्यक्रमानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुण्यात देवेंद्र फडणवीस लक्ष घालणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तर दोन दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेची झालेली हद्दवाढ पाहता शहरात नवीन महापालिकेचा विचार करायला हवा, असे विधान केले होते. त्यामुळे राज्यातील एका मंत्र्यानेच हे विधान केल्याने पुणे महापालिकेचे विभाजन करून दोन महापालिका करण्याबाबत राजकीय चर्चा रंगली होती. तसेच भाजपची ही अधिकृत भूमिका असल्याचेही काही शहर पदाधिकारी खासगीत सांगत होते. याबाबत फडणवीस यांना विचारले असता त्यांनी या चर्चेलाच पूर्णविराम दिला.
फडणवीस म्हणाले की, असा कोणताही निर्णय शासनाच्या पातळीवर घेण्यात आलेला नाही अथवा घेण्याचा विचार नाही. यावरून उगाच नव नवीन वाद निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहे. शहरात दोन महापालिका निर्माण करण्याचा राज्य शासनासमोर कोणताही प्रस्ताव नाही. भविष्यात नवीन महापालिका निर्माण करण्याचा प्रस्ताव येऊ शकतो. जेव्हा करायचे आहे, त्यावेळेस बघू, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानालाच फडणवीस यांनी छेद दिला आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिकेच्या विभाजनाबद्दल एक मोठे विधान केले. पुणे महापालिकेचे किमान दोन भाग करण्याची आवश्यकता असल्याचे पाटील म्हणाले, त्यांच्या या विधानाचे स्वागत शहराच्या पूर्व भागातील राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तसेच “भावी नगरसेवकांनी’ केले. कारण, महापालिकेची निवडणूक कोणत्या ना कोणत्या कारणाने लांबतच चालली आहे, शिवाय पालिकेत 23 गावे समाविष्ट झाली असली तरी या गावांतून फक्त दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत. त्यामुळे नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी पूर्व हवेलीची स्वतंत्र महापालिका होणे हे कधीही फायद्याचेच ठरू शकते. त्यामुळे महापालिकेचे विभाजन करून हडपसर महापालिका करण्यासंदर्भात यापूर्वीही मागणी केली गेली आहे. विशेष म्हणजे यामध्ये पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनीही हा विषय चर्चेला घेतला होता. परंतु, राजकीय सारीपाटात तो मागे पडलेला असताना आता पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी पालिकेचे दोन भाग करण्याचा विषय पुढे आणला आहे.
महापालिकेचे सध्याचे क्षेत्रफळ, आर्थिक आणि राजकीय स्थिती लक्षात घेत वस्तुस्थिती लक्षात घेत पाटील यांनी हा मुद्दा मांडला आहे. “पुण्यात आता 23 नवीन गावे समाविष्ट झाली आहेत. देशातील कुठल्याही महापालिकेपेक्षा पुण्याचे क्षेत्र मोठे झालेले आहे, त्यामुळे आता पुणे महापालिकेचे किमान दोन भाग करण्याची आवश्यकता आहे. मी हे राजकीय बोलत नाही. कारण युनिट जेवढे छोटे होईल तेवढे ते मॅनेज होते,’ असे सूचक विधान पाटील यांनी केले. खरे तर ही वस्तुस्थिती असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
मात्र, “पुण्याचे दोन भाग होणार हा नवीन वाद कशाला काढता. जेव्हा करायचा आहे, तेव्हा बघू. राज्य सरकार पुढे आज तरी कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो. आता, असा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे नाही. मुंबईची तिसरी महानगरपालिका करण्याचा देखील कुठलाही विचार नाही, नवे वादाचे विषय काढू नका.
आपल्याला विकासाकडे जायचे आहे,’ असे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना स्पष्ट करीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे महापालिकेच्या दोन भागाचा म्हणजे विभाजनाच्या विषयावर पडदा टाकला आहे. परंतु, भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो, असेही फडणवीस यांनी नमूद केल्याने भविष्यात पुण्याच्या दोन महापालिका होऊ शकतात, हे नाकारूनही चालणार नाही. अर्थात यात राजकारण आणि राज्यकर्त्यांची “इच्छा शक्ती’ही महत्त्वाची ठरणार आहे. सध्या तरी चंद्रकांत पाटील यांच्या पुणे महापालिकेचे भविष्यात दोन भाग होऊ शकतात, या विधानानंतर संपूर्ण पुणे तसेच समाविष्ट 23 गावांतील वातावरण 24 तासांत पूर्ण ढवळून निघाले आहे.
पुण्याचा पालकमंत्री होणार नाही : फडणवीस
राज्यात अद्याप पालकमंत्र्यांची नियुक्ती झालेली नाही. तर सत्तेत आल्यानंतर प्रकल्पांच्या आढावा बैठकीत फडणवीस यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीतील प्रकल्पांचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे फडणवीस पुण्याच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे स्वत:कडे घेणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यातच, पुण्यातून भाजपला लोकसभेसाठी विक्रमी मतदान झाल्याने पुण्याच्या विकासासाठी फडणवीस यांना पुण्यातून खासदारकीची उमेदवारी द्यावी, अशी मागणी एका संघटनेने केली होती. त्यावरही, फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण पुण्याचे पालकमंत्री होणार नाही तसेच मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही. असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच तुम्हाला मी महाराष्ट्रात नको आहे का, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.