नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या औकातीबाबत केलेले विधान आणि कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींची रावणाशी केलेली तुलना यावरून भारतीय जनता पार्टीने कॉंग्रेस पक्षाची कोंडी करण्याचे सुरूच ठेवले असून कॉंग्रेस पक्षाच्या शंभर शिव्यांना देशातील जनता कृष्ण बनून उत्तर देईल असे आता भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा ( Sambit Patra ) यांनी म्हटले आहे.
“राहुल गांधी विदेशी आहेत की भारतीय?”
पत्रकार परिषदेत बोलताना पात्रा ( Sambit Patra ) म्हणाले की पंतप्रधानांच्या संदर्भात अपशब्द वापरण्याचा प्रकार हा आता हळूहळू कॉंग्रेसमध्ये पायंडा होत चालला आहे. आता कर्नाटकमधील कॉंग्रेस नेते व्ही. एस. उगरप्पा यांनी मोदींचा उल्लेख भस्मासूर असा केला आहे. त्याचा संदर्भ देत पात्रा म्हणाले, कॉंग्रेसच्या शंभर शिव्या आता पूर्ण झाल्या आहेत. आता जनतारूपी कृष्ण त्यांना लोकशाही पध्दतीने उत्तर देईल.
जो व्यक्ती सौराष्ट्रात नर्मदेचे पाणी पोहोचवू शकतो तो कधीच भस्मासुरू होऊ शकत नाही. कोविडच्या काळात ज्या व्यक्तीने नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून दिली तो रावण असू शकत नाही. दरम्यान, कॉंग्रेससोबतच पात्रा यांनी आम आदमी पक्षालाही लक्ष्य केले. हा पक्ष सातत्याने खोटे बोलत आला आहे. त्यांच्या खोटारडेपणाचे पितळ उघडे पडले पाहिजे. येणाऱ्या काळात दिल्लीच्या मद्य धोरणाच्या प्रकरणात मनिष सिसोदिया यांच्यावरही आभाळ कोसळणार आहे. सिसोदिया आणि त्यांचे निकटवर्तीय बरोबर कायद्याच्या कक्षेत येतील असे ते म्हणाले.