रवी कुचेकर
भुईंज येथील परिस्थिती : तळीरामांचा रोजच भर रस्त्यात “फुल टू धिंगाणा’
भुईंज – भुईंज (ता. वाई) येथील सेवारस्त्यालगत असणाऱ्या देशी दारू दुकानामुळे भुईंजसह परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. भररस्त्यात तळीरामांचा रोज सुरू असलेल्या फुल्ल टू धिंगाण्यामुळे महिलांसह तरुणी विशेषत: विद्यार्थिनींना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. या देशी दारू दुकानापासून अवघ्या काही मीटरवर उच्च माध्यमिक विद्यालय आहे. याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना या मद्यपींमुळे रस्त्याने भीतीच्या छायेत ये-जा करावे लागत आहे. एका सुशिक्षित वस्तीच्या मध्यभागी या देशी दारू दुकानाला ग्रामपंचायतीने परवानगी दिलीची कशी? असा संतप्त सवाल आता त्रस्त नागरिकांकडून होऊ लागला आहे.
भुईंज येथील सेवारस्त्याला लागून असलेले जेमतेम 350 ते 400 सुशिक्षित, लोकवस्तीचे नगर म्हणजेच विजयनगर होय. ज्याची मतदार यादीत मालोबा वॉर्ड म्हणून नोंद आहे. या वॉर्डाची ओळख ही जास्तीत जास्त सुशिक्षित आणि नोकरी, व्यवसाय तसेच सर्वच बाबतीत उच्च असलेला वॉर्ड अशी आहे. परंतु काही वर्षांपूर्वी विजयनगर येथील रस्त्याला लागून असलेल्या वसाहतीच्या मध्यभागी सरकारमान्य दारूचे दुकान सुरु करण्यात आले आणि येथूनच खऱ्या अर्थाने, सुशिक्षित सुस्वभावी, सर्जनशील, उच्चशिक्षित असणारी ओळखच नव्हे तर या विजयनगर परिसराचे पावित्र्यच धोक्यात आले. आणि उच्च शिक्षित, सुशिक्षित नागरिकांचे विजयनगर म्हणजे तळीरामांचे माहेरघर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
भुईंज येथे असणाऱ्या विद्यालयासाठी ज्यांनी कोणतेही मोल न घेता जमीन दान केली त्यांच्या नावानेच या विजयनगरची स्थापना झाली. त्यांनी दिलेल्या जागेवर उभे असलेल्या विद्यालयातून शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आजमितीला मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. मात्र अशा या दानशूर व्यक्तीच्या नावाने स्थापना झालेल्या या विजयनगराची देशी दारु दुकानेमुळे अवहेलना सुरु आहे. भुईंज येथील विद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थीनी तसेच शिक्षिकांना याठिकाणी सेवारस्त्यावर चित्रविचित्र अवस्थेत पडलेल्या, बसलेल्या मद्यपींमुळे नाहक त्रास सोसावा लागत आहेत. सेवारस्त्यावरच तळीरामांचा सुरु असलेला धिंगाणा, घाणेरड्या अर्वाच्च शिव्या यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. प्रशासनाने हे दारु दुकान बंद करावे अशी मागणी पालकांमधून व्यक्त होत आहे.
तरुणवर्ग व्यसनाच्या विळख्यात
गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी असलेले दारूचे दुकान शासनाच्या 500 मीटरच्या निर्बंधानंतर काही महिने बंद करण्यात आले होते. मात्र, या निर्बंधामध्ये बदल केल्याने हे दुकान पुन्हा सुरू झाले आहे. या दारू दुकानामुळे भुईंजसह परिसरातील गावांमधील तरुण मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या विळख्यात अडकले आहे. विशेष म्हणजे दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झालेले असताना बंद झालेले हे दारू दुकान पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने विरोध दर्शविणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्यानेच हे दुकान पुन्हा सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
परिसराला अवकळा
भुईंज बसस्थानकासह महामार्गाच्या उड्डाण पुलापासून ते देशीदारू दुकानापर्यंत दररोज एखादा तरी मद्यपी बेधुंद अवस्थेत पडलेला असतो. कधी उड्डाणपुलाच्या खालील बॅरेकेटमध्ये, कधी चिंचेच्या झाडाखाली हे मद्यपी लाळ गाळत रस्त्याकडेला अंगातील कपडे निसटलेल्या अवस्थेत पडलेले असतात. त्यामुळे परिसरला अवकळा प्राप्त झाली आहे.
दारू दुकान हटवा
ग्रामसभेत या देशी दारू दुकानाचा इतरत्र गावाबाहेर स्थलांतराचा निर्णय घेऊन विद्यार्थी, विद्यार्थिनींना, तसेच परिसरातील महिलांना या मद्यपींचा सेवारस्त्यावर व विजयनगरमधील आजूबाजूच्या परिसरात जो फुल टू धिंगाणा चाललेला असतो त्यामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यात यावे अशी मागणी संतप्त महिला व पालक वर्गातून होऊ लागली आहे.
“त्या’ युवानेत्याचा निवडणुकीपुरता स्टंट
साधारण अडीच वर्षांपूर्वी गावातील नव्याने उदयाला आलेल्या युवा नेत्याने लोकवस्तीच्या मध्यभागी असणारे दारूचे दुकान बंद करण्याची मागणी करून गावच्या सरपंचांना सळो की पळो करून सोडले होते. त्याच मुद्द्यावर सदर युवा नेत्याला कधी नव्हे ते लोकांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिले. परंतु सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर हे दुकान बंद करण्यासाठी किंवा इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी लावून धरणे अपेक्षित होते, मात्र याचा विसर संबंधित युवा नेत्याला पडला आहे. उलट दारूबंदीचा विषयच थंडावला असून दारूबंदीच्या मुद्द्याला नक्की कोणत्या पंखा, एसीची हवा लागल्याने हा विषय गारठला असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
लवकरात लवकर देशी दारू दुकानाचा गावाबाहेर इतरत्र स्थलांतराचा केलेला ठराव अमलात न आणल्यास ज्या तळीरामांमुळे महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे अशा तळीरामांना व मालकांना दारूबंदी कमिटीच्या महिला रणरागिणींच्यावतीने हिसका दाखविणार.
नीलमताई कुचेकर,
तालुका कार्याध्यक्ष, दारूबंदी जनआंदोलन कमिटी.