उड्डाणपुलाची मागणी पुन्हा ऐरणीवर : स्थानिक नेत्यांची एकजूट दाखविण्याची गरज
सोरतापवाडी- पूर्व हवेलीतील वाहतूक आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या उरुळी कांचन येथील वाहतूक कोंडीमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. उरुळी कांचन येथील चौकात तर स्थानिक लोक रस्त्यावर गाडी लावून बिनधास्त फिरत असतात.
दुकाने व बॅंकेचे पार्किंग नसल्याने गाड्या रस्त्यावर लावल्या जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येत आहे. त्यामुळे वाहतुकीचा पार खेळखंडोबा झाला आहे. तळवाडी चौकात तर चारही बाजूने स्वतःची वाहन पुढे नेण्यासाठी स्पर्धाच सुरू असते.
त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. महात्मा गांधी रोडवरून कॉलेजचे विद्यार्थी बुलेटच्या फायरिंगचा आवाज काढीत आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता पोलिसांची संख्या कमी आहे. सर्वत्र वाहतूक पोलीस ठेवता येणार नसल्याचे सांगण्यात आले. आमदार व खासदार यांनी लक्ष देऊन उड्डाणपुलांचे नियोजन ताबडतोब करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बाजारपेठेतील व्यापारी त्रस्त उरुळी कांचन हे गाव तीन तालुक्यांना जोडणारे गाव आहे. पुरंदर आणि दौंड तालुक्यातील अनेक गावांचा उरूळी कांचनच्या बाजारपेठेशी संपर्क असतो. त्यामुळे उरुळीची बाजारपेठ कायम गजबजलेली असते. बाजारपेठेत कायम वर्दळ असल्यामुळे त्याचा ताण वाहतूक कोंडीवर पडत आहे. त्यामुळे व्यापारी त्रस्त आहेत.