पुणे : महापालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. चव्हाण नगर धनकवडी येथील दोन सोसायट्यांचा समोरील रस्ता ड्रेणेज टाकण्यासाठी पालिका प्रशासनाकडून खोदण्यात आला, त्यानंतर तब्बल महिन्याभरापासून हा रस्ता तसाच ठेवण्यात आला असून रस्त्यावर मातीचे ढीग साचलेले आहेत. त्यामुळे सोसायटीमधील नागरिकांना वाहनेच बाहेर काढता येत नाहीत या शिवाय, या खोदाईच्या मातीचे ढीगच या रस्त्यावर पडलेले असून नागरिकांना त्यावरून चालताही येत नाही. तर दुसऱ्या बाजूला या प्रकाराची तक्रार क्षेत्रीय कार्यालय तसेच पथ विभागाकडे केल्यानंतरही नागरिकांना केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत असून आम्ही घरी जायचे तरी कसे..? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
महिन्याभरापासून खोदून ठेवलाय रस्ता
चव्हाण नगर, धनकवडी येथील विणकर सभाग़ृहा जवळ सिध्दकला सोसायटी आणि निर्मल पार्क सोसायटी आहे. या ठिकाणी जवळपास 40 घरे असून या घरांच्या समोरून महापालिकेने या पूर्वी केलेला सिमेंटचा रस्ता होता. मात्र, महिन्याभरापूर्वी हा चांगला रस्ता खोदण्यात आला. त्यावेळी या ठिकाणी मोठया व्यासाची पाण्याची लाईन टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ही लाईन टाकूनही झाली. मात्र, रस्ता तसाच खोदलेल्या अवस्थेत ठेवण्यात आला. विशेष म्हणजे हे काम सुरू असताना हा रस्ता चक्क आठ दिवस बंद ठेवण्यात आला. त्यामुळे सोसायटी मधील नागरिकांना आपली वाहने इतरत्र ठेवावी लागली तर खोदाईमुळे बाहेरही पडता येत नव्हते. त्यानंतर नागरिकांनी रस्ता पूर्ववत करून देण्याची मागणी केली.
“गेल्या महिनाभरापासून आमच्या सोसायटीच्या समोरचा रस्ता खोदण्यात आला आहे. आम्ही वारंवार सांगून तसेच तक्रारी करूनही त्याकडे सोयिस्कर दूर्लक्ष केले जात आहे. आधी आठ दिवसांचे काम असेल असे सांगण्यात येत होते. आता काहीच सांगितले जात नाही. रस्त्यावर एवढे मातीचे ढीग आहेत की वाहनेही घेऊन जाता येणार नाही. आम्ही नियमित कर भरतो त्याची अशी शिक्षा महापालिका आम्हाला देणार का ?
– कुमार खराडे ( स्थानिक नागरिक)
यावर पालिकेने आता खोदाई सुरू झाली असून ड्रेणेज तसेच गॅस वाहीनी टाकली जाणार आहे. त्यानंतर रस्ता दुरूस्त केला जाईल असे सांगण्यात आले. मात्र, आता महिना झाला तरी अद्यापही या ठिकाणी क़ोणतेच काम न करता खोदलेला रस्ता जसाच्या तसा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या सोसायटीमधील नागरिकांची चांगलीच कोंडी झाली आहे. आम्ही यासाठीच महापालिकेला कर भरतो, असा सवाल करत आम्ही घरी कसे जायचे हे महापालिकेने सांगावे..? असा प्रश्न उपस्थित केला आहे.