मंचर – सध्याच्या परिस्थितीमध्ये गावोगाव कॅन्सरग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त रासायनिक खते आणि रासायनिक फवारणी टाळून पिकाचे उत्पादन घेणे गरजेचे आहे, असे आवाहन हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले.
नांदूर (ता. आंबेगाव) येथे यात्रेनिमित्त प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना इंदोरीकर महाराज म्हणाले की, बहुतांशी तरुण पिढी व्यसनाधीन आणि कामचुकार होत असून यात्रा उत्सवामध्ये धांगडधिंगा भांडणे याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे यात्रेतील शांतता धोक्यात येण्याची शक्यता आहे. तरूणांनी पारंपारिक कला व रूढी जपण्याचे काम करणे गरजेचे आहे.
श्रीराम मंदिरामध्ये दर्शनासाठी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष संजय थोरात, आंबेगाव तालुका भाजपचे अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव भालेराव, उषा कानडे, भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक रमेश कानडे, कळंबच्या सरपंच उषा सचिन कानडे, उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव, माजी सरपंच राजश्री भालेराव, ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव, माजी उपसरपंच डॉ. सचिन भालेराव यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी नांदूर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी येथील ग्रामस्थानी प्रयत्न केले, अशी माहिती यात्रा उत्सव समितीच्या वतीने सरपंच शेखर चिखले, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष तथा भीमाशंकर कारखान्याचे संचालक अंकित जाधव, यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष संतोष वायाळ यांनी दिली.