मुंबई : राज्यात झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच देशात पाच राज्यात विधानसभा निवडणूका पार पडत आहेत. दरम्यान, याच दोन्ही मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनसेने सरकारकडे मागणी केली आहे. निवडणुका असणाऱ्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित निर्बंध घाला, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडूमधून येणारे नागरिक सुपर स्प्रेडर ठरु शकतात, असे मतही मनसेने मांडले आहे. राजकीय सभांमध्ये होणाऱ्या गर्दीवर बोट ठेवत मनसेने ही मागणी केली आहे.
मनसे नेते बाळा नांदगावरकर यांनी याबाबत ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “राज्य सरकारने बंगाल, तामिळनाडू, केरळ येथून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. कारण तिथे निवडणुकी दरम्यान सगळे नियम झुगारल्याने येणारे नागरिक हे सुपर स्प्रेडर ठरू शकता. याबाबत वेळीच नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे.
राज्य सरकारने बंगाल, तामिळनाडू, केरळ येथून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. कारण तिथे निवडणुकी दरम्यान सगळे नियम झुगारल्याने येणारे नागरिक हे सुपर स्प्रेडर ठरू शकता. याबाबत वेळीच नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) April 9, 2021
सध्या देशामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. इथे होणाऱ्या प्रचार सभांना मोठी गर्दी होत आहे. जर हे नागरिक महाराष्ट्रात आले तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लक्षणविरहीत रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे निवडणुका असलेल्या राज्यांमधून येणाऱ्या नागरिकांवर निर्बंध लावावेत, क्वॉरन्टीनचा कालावधी असो चाचणी याबाबत कठोर नियमावली लागू करावी. त्यामुळे निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रातून जे लोक तिथे गेले आहेत, त्याच्यावर निर्बंध घालावेत, अशी भूमिका मनसेने मांडली आहे.