अकोले – तालुक्यातील विठे घाटात चुलता पुतणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार रात्री उशिरा उघडकीस आला. यात घातपात की व आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
याबाबत माहिती अशी, भारती रामदास जाधव (वय 17, रा. पाभुळवंडी) ही मुलगी दहावीची पुनर्परीक्षा देत होती. काल उशिरापर्यंत घरी न आल्याने तिची आई राजूरला आली आणि तिने राजूर पोलीस ठाण्यामध्ये मुलगी घरी परतली नाही अशा प्रकारची तक्रार नोंदवली. दरम्यान विठे घाटाच्या काळ्याचा दरा या भागामध्ये मेंढपाळ मेंढ्या चारीत असताना काल दुपारी दोन मृतदेह सुबाभळीच्या झाडाला लटकलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ही बाब पोलीस पाटील दत्तात्रय भागाजी वाकचौरे राहणार यांना कळवली.
त्यानंतर वाकचौरे यांनी राजूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. वृत्त समजताच सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक फौजदार रावसाहेब कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चादर फाडून तिच्या पट्ट्या दोघांनी गळ्यामध्ये अडकून आत्महत्या केली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रात्री अकरा वाजता हे दोन्ही मृतदेह राजूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. आज सकाळी शवविच्छेदन केले गेले. मयत मुलगी भारती रामदास जाधव (वय 17) व तिचा चुलत चुलता उत्तम गणपत जाधव (वय 35) या दोघांचे मृतदेह तेथे आढळून आले होते. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत.