तपोवन रस्त्यासाठी 8 ऑगस्टला होणार सुनावणी
औरंगाबाद खंडपीठाचा आदेश, नोटिसा केल्या जारी
नगर – सावेडीतील तपोवन रस्त्यासाठी भूसंपादन करण्याबाबतच्या विषयावर महापालिकेच्या महासभेत निर्णय घेतला नसल्याबद्दल महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना खंडपीठाने नोटिसा काढल्या आहेत. येत्या 8 ऑगस्टला यावर सुनावणी होणार आहे.
महापालिकेच्या मंजूर विकास योजनेतील नगर-औरंगाबाद रस्त्यावरील इंद्रायणी हॉटेलपासून मनमाड रस्त्यावरील कॉटेज कॉर्नरपर्यंतच्या तपोवन रस्त्यात येथील बन्सीमहाराज मिठाईवाले फर्मचे संचालक नंदलाल जोशी यांची खासगी जागा आहे. या जागेच्या भूसंपादनाबाबतचा विषय मागील 16 जुलैला झालेल्या महासभेसमोर घेण्यात आला होता. मात्र, तो स्थगित ठेवला. त्याबाबत जोशींनी खंडपीठात दाद मागितल्याने न्यायालयाने वाकळे व भालसिंग यांना नोटिसा काढल्या आहेत. तसेच दोन आठवड्यांत महासभा घेऊन निर्णय घेण्यास सांगितले आहे.
तपोवन रस्त्यावरील त्यांच्या जागेत झालेले सरकारी अतिक्रमण काढण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा केला होता. तेथील आदेशानंतर अतिक्रमण काढले. ते पुन्हा होऊ नये, म्हणून या जागेला कंपाउंड केले होते. पण त्या परिसरातील नागरिकांना जाण्या-येण्यास अडचण होत असल्याने त्यांनी पालिकेकडे रस्त्याची मागणी केली होती. महापालिकेने जोशी यांना बोलावून रस्त्यासाठी जागा दिली जावी, त्याची बाजारभावाने किंमत देण्याचे 2009 मध्ये लेखी दिले होते. पण 2016 पर्यंत त्याबाबत काही कार्यवाही केली नसल्याने खंडपीठात त्यांनी याचिका केली आहे. या याचिकेच्या सुनावणीत 2018 मध्येच महापालिकेने भूसंपादनाचा विषय महासभेसमोर ठेवून निर्णय घेण्याचे स्पष्ट केले होते.