आळंदी, {एम. डी. पाखरे} – चिऊताई, चिऊताई दार उघड ! दार असे लावून, जगावरती कावून, किती वेळ डोळे मिटून आत बसशील ? आपले मन आपणच खात बसशील ? कविवर्य मंगेश पाडगावकरांची ही कविता आजही प्रत्येकाच्या ओठी आहे. आता तुम्ही म्हणाल आज ही कविता का? तर त्याला कारणही तसंच आहे. बुधवारी (दि. 20) जागतिक चिमणी दिन आहे.
जागतिक चिमणी दिवस जगभरात चिमणी संवर्धनासाठी जागर करणारा दिवस. पहिला जागतिक चिमणी दिन 2010 मध्ये जगाच्या विविध भागात साजरा करण्यात आला. मात्र गाव-शिवारातून चिमण्या कमी होत चालल्या आहेत. शहरात चिमणी शोधावी लागते. पुढे मुलांना फोटोतच चिमण्या दाखवाव्या लागतील की काय, अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे.
पूर्वी अंगणात धान्य वाळू घातले जायचे. शेतीत असणार्या खळ्यातूनही त्यांना अन्न मिळत असे. मात्र आता वाळू घातलेल्या धान्यावर असणार्या किटकनाशक पावडरमुळे चिमण्यांना प्रजननात अडचणी आल्या आहेत.
पूर्वीच्या काळी असलेल्या जुन्या घरांमध्ये कौलारु घरांमुळे चिमणीला आपले घरटे बांधण्यासाठी जागा असायची, ती अगदी सहज माणसाच्या घरात ये-जा करु शकत असे. मात्र आता चकचकीत घरांमध्ये, स्लाईडिंगच्या खिडक्यांमधून चिमणीताईला घरात येण्यासाठी रस्ता हरवला आहे. मोबाइल टॉवर्सचे रेडिएशन्स, हानिकारक किरणे यामुळेही कित्येक चिमण्यांचा मृत्यू झाला आहे.
या चिमण्यांनो, परत फिरा रे…
चिमण्यांची संख्या घटल्याने या चिमण्यांनो, परत फिरा रे.. अशी साद घालायची वेळ आपल्यावर येऊन ठेपली आहे. त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले, तर त्यांची घटलेली संख्या नक्की वाढेल, असे पक्षीप्रेमींना वाटते.
मानवी वस्तीमध्ये शक्य तेथे वृक्षारोपण, तसेच कृत्रिम घरटी आणि मातीच्या भांड्यात पाण्याची व्यवस्था, घराच्या अंगणात व गच्चीवर दररोज पसाभर धान्य पसरवून टाकणे, अशा उपाययोजना केल्या, तर चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा अनुभवायला मिळू शकेल, असा विश्वास पक्षीप्रेमींनी व्यक्त केला आहे.