शिक्रापूर, (वार्ताहर)- सध्या वाढत्या जागती करणामुळे सर्वत्र वेगवेगळा बदल होत असताना पशु पक्ष्यांची संख्या देखील कमी होत असल्यामुळे भारतात 2010 पासून 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात येत आहे. चिमणी पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी चिमण्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
मनुष्यवस्तीत माणसांच्या घराच्या छतावर राहून पिलांना जन्म देणारा पक्षी म्हणजे चिमणी, अलीकडील काळात शेतीसह जुनी दगड मातीची घरे नाहीसे होऊन सिमेंटची घरे व बंगले उभी राहत आहेत. तसेच मोबाईलचे टॉवर उभे राहिल्याने चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे, पूर्वीच्या काळी दारात आलेल्या चिमण्यांसह लहान लहान बालके खेळत होते,
तर चिमण्यांवर गाणी म्हणत बाळाची आई बाळांना खाऊ घालून झोपी लावत असे; परंतु अलीकडील बदलत्या काळामुळे चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात येत असल्यामुळे चिमण्या नाहीशा होत चाललेल्या असल्यामुळे जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात येत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जागतिक चिमणी दिन येत असल्याने नागरिकांनी घराच्या जवळ आजूबाजूला चिमण्यांसाठी कुत्रिम घरटी ठेवून घरांच्या छतावर पक्ष्यांसाठी दाने व पाणी ठेवण्याची आवश्यकता आहे, शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी काही शाळा तसेच पक्षीमित्रांच्या पुढाकाराने प्रत्येक वर्षी अनेक ठिकाणी डोंगरा सह नद्यांच्या कडेला गरजेनुसार पक्ष्यांच्या अन्न पाण्याची तसेच कृत्रीम घरट्यांची व्यवस्था करण्यात येत असते.
पक्षीमित्रांनी लावलेल्या कृत्रिम घरट्यांतून अनेक चिमण्यांचे कुटुंब तयार झालेले असून या कृत्रिम घरट्यांतून अनेक पिल्लांचा जन्म झाल्याचे समाधान पक्षीमित्रांना आहे. यापुढील काळात देखील नागरिकांनी चिमण्यांसह पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पुढे येण्याची गरज असून, पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने पक्ष्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे सचिव अमर गोडांबे, पक्षीमित्र सूरज वाघमारे यांनी सांगितले आहे.
जागतिक चिमणी दिनापासून अनेक पक्षीप्रेमी तसेच वन्य जीवांचे रक्षण करणार्या संघटना पुढाकार घेऊन चिमण्यांच्या दाणा पाण्यासह कृत्रिम घरट्यांची व्यवस्था करत असतात. प्रत्येक नागरिकांनी या पक्षी मित्रांकडे जर मूठभर धान्याची मदत केली तर नागरिकांची छोटीशी मदत पक्ष्यांच्या हिताची असणार आहे. -शेरखान शेख, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद सर्पमित्र व पक्षीमित्र