लोणी काळभोर,(वार्ताहर) – बदलत्या जीवनशैलीमुळे माणसाचा आनंद लोप पावला असून, सुखी-समृद्धी व आरोग्यपूर्ण दीर्घायुष्याचा मंत्र हसत-खेळत जगणे हाच असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध सिने, नाट्य अभिनेते गजानन पातुरकर यांनी व्यक्त केले.
येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन, विविध गुणदर्शन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी स्थानिक शिक्षण सल्लागार मंडळाचे अध्यक्ष सुभाष काळभोर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव, प्राचार्य सिताराम गवळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या पौर्णिमा शेवाळे उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करणार्या आपल्या मार्गदर्शनपर विवेचनात त्यांनी सुखी-समृद्धी जीवनाचा मूलमंत्र सांगताना मानवी जीवनातील हास्याचे महत्त्व विशद करतानाच आयुष्यात हसणे हरवलेला माणूस तणावग्रस्त असतो. विद्यार्थ्यांनो जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सतत हसत, तणावमुक्त व आनंदी राहा. असा सल्ला दिला.
आपल्या बहारदार व रंगतदार मनोगतातून गजानन पातुरकर यांनी विद्यार्थ्यांचे मनोरंजन करून प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या यशस्वी स्पर्धक विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. विविध क्रीडा स्पर्धा, रांगोळी, निबंध, चित्रकला, वक्तृत्व, मेहंदी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा यांसह इतर अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाची विद्यार्थिनी राष्ट्रीय खेळाडू काजल भोर या विद्यार्थिनीचा विशेष सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाची ही विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये खेळलेली आहे. आता ती देशांतर्गत स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहे. तिच्या या चमकदार कामगिरीबद्दल तिचा मान्यवरांकडून सन्मान करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. मंजुळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन प्रा. सुहास नाईक तर शारीरिक शिक्षण संचालक डॉ. लक्ष्मण दोडमनी यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक प्रमुख प्रा. पी. एम खनुजा यांच्यासह सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.