चार दृश्यांश… लागोपाठ… कल्पना करा… एक दिवाणखाना सदृश जागा… एका कॉफी टेबलवर एक पुस्तक पडलंय… त्यावर वेष्टन आहे.. .त्याचंसमीप दृश्य… एक व्यक्ती प्रवेशते… सोफ्यावर बसून पुस्तक हातात घेते… पुस्तक उघडून वाचायला सुरुवात करते… व्यक्तीच्या खांद्यावरून पुस्तकाचं समीप दृश्य… मजकुरावरून ते वाचकानं उलटं धरल्याचं दिसत… वाचक पानं उलटत चाललाय… एका पानावर एक चित्र दिसतं… ते सुद्धा उलटं दिसतं… पण वाचकाला चित्र उलटं आहे हे लगेच लक्षांत येतं आणि तो पुस्तक सुलटं करून चाळायला लागतो… त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित…
ही अक्षर साक्षरतेपेक्षा दृश्य साक्षरतेचे महत्त्व विशद करणारी चित्रफीत अनेक वर्षांपूर्वी, साक्षरता अभियानांतर्गत सादर केली गेली होती. या चित्रांना नेहमीच काहीतरी सांगायच असतं. ज्यांना अक्षरं कळत नाहीत त्यांची ज्ञानवृद्धी ती करू पाहातात.
2016 च्या मध्यापासून, आसावरी काकडे यांनी रोज एक स्वत: काढलेलं छायाचित्रं अरुण काकतकर यांना पाठवायला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत त्यांचे दोन सुहृद, मिलिंद सबनीस आणि राम केळकर यांनीसुद्धा छायाचित्रं किंवा स्वत: रेखलेली चित्रं त्यांना पाठवायला सुरुवात केली. त्या चित्राचं काकतकर मनोगत लिहायला लगले. आशय उपलब्ध चौकटींतच बसवायचा असल्यानं, त्याला साहजिकच अल्पाक्षरींचं स्वरूप येत गेलं… त्या मूक चित्रांना वाचा देण्याचा हा एक प्रयत्न सातत्यानं सुरू ठेवला.अशा या आगळ्या सहयोगाने गेल्या पाच वर्षांत या चौकडीनं जवळपास दीड हजार चित्रशब्द चौकटी सादर केल्या.
त्यातल्या काही निवडून “चित्राक्षरी’ या ई पुस्तकाच्या माध्यमांतून रसिक वाचकांसाठी सादर होताहेत.
आतापर्यंत आपण अनेक निसर्ग कविता वाचल्या, पण एखाद्या फुलांच्या फोटोवर, झाडांच्या फोटोवर कविता केलेलं स्मरतय का हो? पानांच्या नैसर्गिक रचनेत भूमिती दडलेली दिसते हे आपण कधी बघितलं आहे का? काकतकरांनी ते अगदी सुंदर भाषेत सादर केलं आहे. “जांभळ्या रंगाच्या पाना-फुलांची तर गंमतच बरं का, एकदा वाटतंय त्यांना की ते लाजून चुरर्र होतंय तर दुसऱ्याच क्षणी म्हणतात कसे एवढा कसला राग आलाय बाई नीळ जांभळ व्हायला? पिवळ्या फुलांची पान लांब सडक, हिरवीगार तर त्याच्यात त्यांना ती त्रिमिती साधताना दिसतात, गोकर्णच फूल तर आपल्याला गयावया करताना भासत नका खुडू नका गाभाऱ्यात नेऊ, दिठीच पारणं फेडतंय बाळी दृष्ट नका लावू’.
कधी चारच ओळींमध्ये तर कधी आठ आठ ओळींमध्ये ह्या फुलांमार्फत शब्दांद्वारे आपल्याला जीवनाचा मर्म सांगून जातात त्यामुळे प्रत्येक फोटो जिवंत झाल्यासारखा वाटतो. प्रत्येक फोटोत त्याच्या भावना दडल्या आहेत आणि त्या अलगद आपल्या हृदयापर्यंत पोचतात ते केवळ काकतकरांच्या अफाट शब्दसंग्रहामुळे. नकळत आपल्यालाही ते ही दृष्टी देतात. एकाहून एक सुंदर फोटो. रंगसंगती, प्रकाशयोजना, योग्य कोन साधणं आणि त्यावर शब्दांचा, काव्याचा साज सजणं… आहाहा! त्या निर्जीव फोटोतल्या फुलांनाही आपलं जीवन सार्थकी लागल्यासारखा वाटत असेल. ई-साहित्य प्रतिष्ठानवर या ई पुस्तकाचे विनामूल्य आपण आस्वाद घेऊ शकतो.
– प्रतिनिधी