नवी दिल्ली ; भारत आणि चीन यांच्यातील तणाव संपुष्ठात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी भारतीय लष्कराकडून देण्यात आली होती. मात्र या गोष्टीला पुन्हा एकदा चीनकडून तडा देण्यात आला असल्याचे समोर आले आहे. कारण दोन्ही देशांच्या सीमेवर चीनकडून गोळीबार करण्यात आला असून त्यात तीन भारतीय जवान शहिद झाले आहेत.भारतीय लष्कराकडून याविषयी माहिती देण्यात आली आहे.
Indian Army officer and two soldiers killed in Ladakh's Galwan Valley on Monday night during "violent face off" with Chinese: Army
— Press Trust of India (@PTI_News) June 16, 2020
भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव असून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये हिंसक चकमक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, लडाखमधील गालवान खोऱ्यात सोमवारी रात्री ही चकमक झाली. यावेळी चीनने केलेल्या गोळीबारात तीन भारतीय जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे १९६७ नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये अशा पद्धतीने हिंसक चकमक झाली आहे. यामुळे तणाव वाढण्याची भीती आहे.
भारतीय लष्कराकडून यासंबंधी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. यानुसार, गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक झाली. यामध्ये भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. यानंतर दोन्ही देशांमधील वरिष्ठ अधिकारी तणाव वाढू नये यासाठी आपापसांत चर्चा करत आहेत.
काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी चीनलगतच्या सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले होते. सध्या दोन्ही देशांत जे मतभेद आहेत, ते संवादाच्या माध्यमातून मिटतील,असा आशावादही त्यांनी व्यक्त केला होता. भारतीय लष्करी अकादमीच्या दीक्षान्त संचलनप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की, कोअर कमांडर पातळीवर आम्ही चीनशी संवाद सुरू केला आहे. अलीकडेच बऱ्याच प्रमाणात सैन्य हलवण्यात आले असून निरंतर संवादातून उर्वरित मतभेद मिटवून हा प्रश्न सोडवला जाईल. दोन्ही देशांनी टप्प्याटप्प्याने माघार सुरू केली आहे. गलवान नदी भागात दोन्ही देशांनी टप्प्याटप्प्याने माघार घेतली असून आतापर्यंतचा सर्वात फलदायी संवाद दोन्ही देशात झाला आहे.