नवी दिल्ली : मागच्या आठवड्यात भारत आणि चीन यांच्यातील तणावाचे वातावरणानंतर चर्चेनंतर निवळला होता. दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यासाठी भारत आणि चीनमध्ये लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चा सुरु आहे. पण चीनने आपल्या कुरापती करणे काही सोडले नसल्याचे पाहायला मिळत आहे.कारण दोन्ही देशात चर्चा सुरु असतानाच चीनने गलवान खोऱ्यातील संघर्ष झालेल्या ठिकाणी पुन्हा बांधकाम केले आहे. सॅटलाइट फोटोवरुन चीनने संघर्ष झालेल्या ठिकाणी पुन्हा बांधकाम केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मागच्या आठवड्यात १५ जूनच्या रात्री पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ चीनने टेहळणी चौकी उभारल्याने मोठा संघर्ष झाला होता. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनने ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले होते. चीन आता चर्चेच्या माध्यमातून वाद सोडवण्यात आपल्याला रस आहे असे दाखवतोय, पण प्रत्यक्षात नियंत्रण रेषेवरील त्यांचा आक्रमक पवित्रा अजूनही कायम आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
गलवान व्हॅलीतील संघर्षानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यावर जोर दिला. मात्र, त्यानंतर चीनने आता सैन्य देपसांग, दौलत बेग ओल्डी सेक्टरमध्ये हलवले आहे. चीन येथे सैन्य तळ उभारत असून, पुन्हा भारतीय लष्कराच्या गस्तीमध्ये अडथळे आणण्याच्या प्रयत्न करत आहे.
गलवान खोऱ्यातील सॅटलाइट फोटोमध्ये दिसणाऱ्या चिनी बांधकामाला लष्कराने दुजोराही दिलेला नाही किंवा ते फेटाळलेले सुद्धा नाही. मॅक्सार या स्पेस टेक्नोलॉजी कंपनीने २२ जून रोजी हे फोटो काढले आहेत. पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ चीनने बांधकाम केल्याचे यातून स्पष्ट दिसते. १७ जून ते २२ जून या कालावधीत हे बांधकाम करण्यात आले आहे. कारण प्लॅनेट लॅबच्या १६ जूनच्या फोटोमध्ये संघर्ष झालेल्या ठिकाणी असे कुठलेही बांधकाम दिसले नव्हते.