सातारा -राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून विविध धोरणात्मक निर्णय घेऊन सर्वसामान्यांना न्याय देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी विविध योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
विधानपरिषदेवर निवड झाल्यानंतर आ. शिंदे पहिल्यांदाच जिल्हा परिषद कार्यालयात आले होते. या निवडीबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण सभापती सौ. सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती सौ. कल्पना खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
संकटकाळातही राज्यात महाविकास आघाडीचे सरकार चांगले निर्णय घेत आहे. जिल्हा परिषद स्तरावर या निर्णयांची चांगली अंमलबजावणी करुन हे जनतेचे सरकार आहे, याची जाणीव करुन देण्याचे आवाहन आ. शिंदे यांनी केले. करोना उपाययोजनाबाबत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले काम झाले आहे.
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत असून त्यांचे मनोबल वाढवण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा, असे सांगून शासन स्तरावरील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. शिंदे यांनी दिली. विविध विभागांचा आढावा घेऊन यावेळी जिल्ह्यातील प्रमुख प्रश्नांवर चर्चा झाली. राजेंद्रकाका भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.