China in Maldives : भारतासोबतच्या मालदीवचे तणावपूर्ण वातावरण असले तरी दुसरीकडे चीनशी त्याची मैत्री वाढत असल्याचे दिसत आहे. याचाच प्रत्यय आता जगाला येत आहे. कारण चीनने मालदीवमध्ये आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून चीनचे संशोधन जहाज मालदीवच्या दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.
चीनचे संशोधन जहाज ‘जियांग यांग हाँग 03’ मालदीवची राजधानी मालेकडे जात आहे. भारतीय नौदलाला याची जाणीव असून त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. श्रीलंकेजवळ दिसलेल्या जहाजाप्रमाणेच हे जहाज आहे, त्यावेळी भारताने या जहाजावर आक्षेप घेतला होता.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, संरक्षण सूत्रांनी सांगितले की, भारतीय नौदलाला चिनी संशोधन जहाजाविषयी माहिती मिळाली आहे आणि ते त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत ‘इंडियन एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन’ (EEZ) मध्ये जहाजाद्वारे कोणत्याही प्रकारचे संशोधन कार्य केल्याचे समोर आलेले नाही. चिनी राइझर जहाज काही आठवड्यांत मालदीवमध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे.
मालदीवसोबत भारताचा तणाव
भारत आणि मालदीवमधील संबंध सध्या तणावपूर्ण आहेत. याचा फायदा चीन घेऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर दोन्ही देशातील संबंध खूपच ताणले गेले आहेत. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांच्यामुळेही संबंध बिघडू लागले आहेत, कारण ते चीन समर्थक नेते म्हणून ओळखले जातात. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोइज्जू यांनी ‘इंडिया आऊट’ मोहीम चालवली होती, त्यामुळे त्यांचे सरकार स्थापन झाले.
यापूर्वीच चिनी जहाजांना श्रीलंकेने प्रवेश दिला
चिनी जहाज अशा वेळी मालदीवमध्ये पोहोचत आहे जेव्हा गेल्या वर्षीच श्रीलंका सरकारने एका चिनी जहाजाला बेटाच्या पश्चिम किनार्यावर सागरी संशोधन करण्याची परवानगी दिली होती. चिनी जहाजाने श्रीलंकेच्या देखरेखीखाली दोन दिवस संशोधन केले. त्यावेळी पाठवलेल्या चिनी जहाजाचे नाव होते ‘Xi Yan 6’. हे चिनी हेरगिरीचे जहाज असल्याचेही सांगण्यात आले. श्रीलंकेने यापूर्वीच चिनी जहाजांना कोलंबोच्या मुख्य बंदरात प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे.
हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या उपस्थितीबद्दल भारताने यापूर्वीच चिंता व्यक्त केली आहे. श्रीलंकेत चीनच्या वाढत्या प्रभावामुळे भारत चिंतेत आहे कारण हा देश भारतीय बेटाच्या अगदी जवळ आहे. एवढेच नाही तर पूर्व-पश्चिम आंतरराष्ट्रीय जहाज मार्गही येथून जातात. व्यापाराच्या दृष्टीने हा सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. चीन श्रीलंकेत आपला तळ प्रस्थापित करू शकतो, त्यामुळे सुरक्षा धोक्यात येऊ शकते, अशी भीती भारताला वाटत आहे.