कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोल्हापूरच्या लक्षतीर्थ वसाहतीत सुरु असलेला बालविवाह लक्ष्मीपुरी पोलिस आणि जिल्हा बालसरंक्षण कक्षाने मंगळवारी रोखला. लग्नाच्या अक्षता पडण्यापूर्वीच पती राहुल राजूनाथ गोसावी (वय २४), वडील राजू अशोकनाथ गोसावी (४२), आई मनीषा राजूनाथ गोसावी (३६, सर्व रा. नवनाथनगर, वाकळी वसाहत शेजारी, इस्लामपूर, ता. वाळवा) आणि रेखा संदीप गोसावी ( रा. लक्षतीर्थ वसाहत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या सोशल वर्कर प्रणाली अनंत दुधगावकर यांनी फिर्याद दाखल केली. लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता लक्षतीर्थ वसाहत येथील रेणुका गल्ली येथील सुभाष गोसावी यांच्या इमारतीजवळील श्री स्वामी समर्थ मनमंदिराच्या खुल्या सभागृहात हा विवाह सुरु असल्याची माहिती बालसंरक्षण विभागाला मिळाली.
संबधित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असून विवाह करण्याचे गोसावी कुटुंबियांनी ठरविले होते. मात्र या विवाहाची माहिती मिळाल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिस आणि बालसंरक्षण कक्षाच्या पथकाने अक्षता पडण्यापूर्वीच नवरदेवाला ताब्यात घेतले. हा विवाह संगनमताने करण्याचे ठरले. अधिक तपास लक्ष्मीपुरी पोलीस करत आहेत.