मुंबई : राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुखांच्या बैठकीत ठाकरे बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता व्यक्त केली. तसेच कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान, या त्यांच्या विधानावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे.
पालघरमध्ये कोकण महोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी“आम्हाला निवडणुकांची भीती नाही. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काम करत नसल्याने आम्हाला त्याची तयारी करण्याची गरज नाही,” असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. तसेच, मध्यावधी निवडणुकांचे लॉजिक काय? हा संभ्रम का निर्माण करत आहात? अशी विचारणाही त्यांनी केली.
“त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आपल्याकडील आमदार, लोकप्रतिनिधी सोडून जाता कामा नये यासाठी ते अशी वक्तव्यं करत आहेत. आघाडीतील पक्षही शिवसेना आमचा नैसर्गिक मित्रपक्ष नसल्याचं म्हणत आहे. काँग्रेसमधील २२ जण भाजपात जाणार, तसंच काही लोक फुटून बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाणार असल्याचं बोललं जात आहे. आपली लोकं थांबवून ठेवण्यासाठी संभ्रम निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे,” असा दावा एकनाथ शिंदेंनी केला.
“आपलं १७० आमदारांचं मजबूत सरकार आहे. अडीच वर्ष पूर्ण ताकदीनं काम करु आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु हे त्यांना माहिती आहे. म्हणून ते घाबरले असून अशी विधानं करत आहेत. अडीच वर्षानंतर जनता काम करुन देणाऱ्या लोकांनाच निवडून देणार आहे. तेव्हा आमच्या २०० हून अधिक जागा येतील,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात अस्थिर राजकीय परिस्थिती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मोठय़ा घोषणा करायला सुरुवात केली आहे. गुजरातमध्येही त्यांनी मोठे प्रकल्प व गुंतवणुकीच्या घोषणा केल्या व निवडणुका जाहीर झाल्या. राज्यातील सरकारमध्ये अस्थिरता असून काही आमदार नाराज असून फुटण्याचा विचार करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काही काळाने अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर मध्यावधी निवडणुकांची शक्यता ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे आपले सरकार असताना केलेली कामगिरी घरोघरी पोचविण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.