मुंबई – शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना राज्याच्या राजकारणात उलथापालथी सुरु आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणुका लागू शकतात असं म्हणत निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या. आता यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मध्यावधी निवडणुकीसाठी युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती आली आहे का ? कशामुळे मध्यावधी निवडणुका घेणार ? काही कारण असलं पाहिजे ना,उद्धव ठाकरेंनी कारण सांगावे,असे सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केले आहेत. प्रसार माध्यमांशी बोलताना राणे यांनी ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेतला. त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून मध्यावधी निवडणुका होणार का ? अभ्यासू आणि वैचारीक पद्धतीने त्यांनी सूचना दिलेली नाही. त्यांनी घराच्या बाहेर येऊन बोलावं असा टोला देखील यावेळी राणेंनी ठाकरेंना लगावला.
राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात अजित पवार गैरहजर होते यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत असं नारायण राणेंना विचारले असता,ते म्हणाले अजित पवारांची नाराजी मला कशी कळेल ? त्यांच्या जवळचे आहेत त्यांनाच नाराजी कळेल. त्याबाबत आमच्या देवेंद्र फडणवीस यांना जास्त माहिती आहे, त्यांना विचारून सांगतो अशी मिश्किल प्रतिक्रिया यावेळी नारायण राणेंनी दिली.