माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी
राहाता (प्रतिनिधी) – साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान तातडीने मागे घ्यावे,अशी मागणी माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. साईबाबांच्या जन्मस्थळावरुन पाथरीच्या विकासाला निधी देण्यास आमचा विरोध नाही, पण पाथरीकरांकडुन केल्या जाणाऱ्या दाव्याला सरकारने भावनीकतेतुन पाठबळ देवू नये, असे सुचित करताना या वादामागील प्रवृत्तीही आता शोधण्याची वेळ आली आहे, असे मतही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
साईबाबांच्या जन्मस्थळावरुन निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभुमीवर आ. विखे पाटील यांनी शिर्डी विश्रामगृहात गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आ. विखे पाटील यांनी उद्याच्या बंदला माझा पाठींबा असुन, शिर्डीकर ग्रामस्थ जो निर्णय घेतील, त्यांच्या भुमिकेबरोबर मी आहे असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, साईबाबांच्या जन्मस्थळाचे दावे यापुर्वीही 8 ते 10 वेळा केले गेले, असे वाद जाणीवपुर्वक उपस्थित करुन लाखो साईभक्तांच्या भावणांशी खेळण्याचा प्रयत्न होतोय का? शिर्डीची सामाजिक, अध्यात्मिक घडी मोडण्याचा प्रयत्न केला जातोय का? या मागे नेमक्या कोणत्या प्रवृत्ती आहेत हे शोधण्याची आता खरी गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्याकडे ऋषिचं कुळ आणि नदीच मुळ कधीच शोधु नये असे म्हटल जात त्याचप्रमाणे साईबाबांनी आपल्या हयातीत जात, धर्म, पंथ कधी उघड केले नाहीत. जातीचा आणि धर्माचा अडसर माणुसकीत येवू नये हाच विचार साईबाबांनी मांडला. त्यामुळेच जगभरातील भाविकांसाठी शिर्डी हे श्रध्दास्थान सर्वधर्म समभावाचे प्रतिक ठरले आहे याकडे लक्ष वेधुन विखे पाटील म्हणाले की, सबका मालीक एक हा संदेश घेवून देशात आणि देशाबाहेर साईबाबांची असंख्य मंदिरे उभी राहीली. ती त्या त्या भागाच्या सामाजिक उत्कर्षासाठी कारणीभुत ठरली. पाथरीचे साईमंदिर हे त्यापैकीच आम्ही एक मानतो. या परिसराचा विकास करण्यास आमचा विरोध नाही, पण साईबाबांच्या जन्मस्थळाचा भावनिक मुद्दा उपस्थित करुन तो विकास नको ही आमची भुमिका आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले.
साईबाबांच्या जन्मस्थळाचा वारंवार मुद्दा उपस्थित करुन केवळ शिर्डीतील नागरीकांच्याच नाही तर लाखो साईभक्तांच्या भावणेला हात का घातला जातो असा प्रश्न उपस्थित करुन ते म्हणाले की, यापुर्वी राष्ट्रपतींनीही असेच भाष्य केल्यानंतर शिर्डीतील ग्रामस्थांनी त्यांची भेट घेवून याबाबत समज दुर केला होता. त्यानंतरच राष्ट्रपतींनी पाथरीला जाण्याचे टाळले होते. राष्ट्रपती असतील किंवा सध्याचे मुख्यमंत्री असतील यांना दिशाभुल करणारी माहिती देवून सातत्याने या वादाला खतपाणी कोण घालत आहे, याचा शोध सरकारने घेण्याची मागणी त्यांनी केली.
पाथरीकरांकडे साईबाबांच्या जन्माचे 29 पुरावे आहेत तर साईबाबांचे जन्मशताब्दी वर्ष संपल्यानंतरही हे पुरावे घेवून पुढे कोणीच आले नाही. दाभोळकरांनी जे मुळ साईचरित्र लिहीले आहे. त्यामध्येही साईबाबांच्या जन्मस्थळाचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळेच दाभोळकरांच्या साईचरित्राची मुळ प्रत संस्थानच्या ताब्यात आता आली आहे. त्याचे पुर्नप्रकाशन संस्थानने करावे. इतर भाषांमधील साईचरित्रासाठीही दाभोळकरांचेच साईचरित्र आधारभुत मानावे जेणेकरुन सातत्याने निर्माण होणारे वाद थांबले जातील असे विखे पाटील यांनी यावेळी सुचित केले.