व्यक्त होणे, भावनांना वाट मोकळी करून देणे किंवा संवाद करणे हा माणसाचा मनुष्यभाव आहे. भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात तर व्यक्त होण्यासाठी प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करण्यात आले आहे. ज्यामुळे प्रत्येकजण आपले मत, बाजू मांडू शकतो. व्यक्त होताना मनुष्य कोणत्या पद्धतीने व्यक्त होतो यावर त्या व्यक्तीचे स्वभाववैशिष्ट्य ठरत असते. साधारणपणे व्यक्त होताना (संवादातून किंवा कृतीतून) काही पद्धती या स्वभाव वैशिष्ट्यानुसार अधोरेखित होत असतात. कोणतीही व्यक्ती ही दोन पद्धतीने व्यक्त होत असते. एक म्हणजे प्रतिक्रिया तर दुसरी म्हणजे प्रतिसाद. तसे समानार्थी वाटणारे हे शब्द भिन्न-भिन्न अर्थ आणि भाव प्रतीत करणारे आहेत.
प्रतिक्रिया (रिऍक्ट) आणि प्रतिसाद (रिस्पॉन्ड) या दोन भिन्न अर्थाच्या गोष्टी आहेत. प्रतिक्रिया देणे म्हणजे मागचा पुढचा विचार न करता तत्काळ मत अथवा कृतीतून व्यक्त होणे. तर प्रतिसाद म्हणजे प्राप्त परिस्थितीवर विचार करून त्यावर तोडगा काढणे होय. गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका झुरळाच्या गोष्टीवरून या दोन्ही गोष्टी पटवून सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितलेला प्रसंग नंतर प्रेरणादायी संदेशाच्या रूपाने जगभरात प्रसिद्ध झाला. त्यांनी सांगितलेल्या किस्स्याप्रमाणे सुंदर पिचाई एकदा एका हॉटेलात कॉफी प्यायला गेले होते. त्यांच्या शेजारच्या टेबलावर एक ग्रुप बसला होता. त्यात काही महिला पण होत्या. अचानक एक झुरळ उडत येऊन एका महिलेच्या अंगावर बसले. ते झुरळ बघून ती महिला घाबरून किंचाळू लागली.
तिचे किंचाळणे आणि थयथयाट मिनिटभर चालला होता. मोठ्या मुश्किलीने तिने ते झुरळ झटकून टाकले तर ते झुरळ त्याच ग्रुपमधल्या दुसऱ्या महिलेच्या अंगावर जाऊन बसले. मग त्या महिलेने पण किंचाळायला व थयथयाट करायला सुरुवात केली. तेवढ्यात त्या हॉटेलचा वेटर तेथे आला. त्या दुसऱ्या महिलेने पण मोठ्या मुश्किलीने ते झुरळ झटकून टाकले तर ते झुरळ त्या वेटरच्या अंगावर जाऊन बसले. पिचाई यांना वाटले की आता वेटर पण थयथयाट करणार. पण तसे काही झाले नाही. ते झुरळ अंगावर पडताच तो वेटर स्तब्ध उभा राहिला. अजिबात हालचाल न करता त्या झुरळाच्या हालचाली बघत राहिला. योग्य वेळ येताच त्याने ते झुरळ झटक्यात पकडले आणि हॉटेलबाहेर फेकून दिले.
या प्रसंगावर सुंदर पिचाई सांगतात की, जी गोष्ट त्या वेटरला जमली ती गोष्ट त्या दोन महिलांना जमली नाही. कारण त्यांच्या व्यक्त होण्यात फरक होता. महिलांनी घाबरून किंचाळून लगेच प्रतिक्रिया (रिऍक्ट) दिली होती तर त्या वेटरने शांत विचारपूर्वक त्या प्रसंगावर प्रतिसाद (रिस्पॉन्ड) दिला होता.
थोडक्यात काय तर महिलांनी व्यक्त होताना भीतीतून प्रतिक्रियेचा मार्ग अवलंबला त्यामुळे काहीकाळ गंभीर वातावरण निर्माण झाले; परंतु त्या वेटरने विचारपूर्वक प्रतिसाद देऊन मार्ग काढल्याने त्या समस्येचे क्षणात निराकरण झाले.
दैनंदिन जीवनात आपणही अनेकदा अ..रे ला का..रे अशी प्रतिक्रिया देत विवादाला आमंत्रण देत असतो. परंतु त्या अ..रे ला संयमाने योग्य प्रतिसाद दिल्यास मात्र एका सुसंवादाची पेरणी होत असते.
आयुष्य जगताना अनेक अडचणी, समस्या आपल्यासमोर आ वासून उभ्या असतात. अशावेळी भीती, भ्रम, तणाव, पूर्वग्रह, आत्मविश्वासाचा अभाव आणि नकारात्मक मानसिकतेपोटी आपण तत्काळ प्रतिक्रिया देण्याच्या मोहात पडतो आणि यातून काहीतरी प्रतिकूल परिणामांचा सामना आपणास करावा लागत असतो. मुळात प्रतिक्रिया देणे हा जरी मनुष्यभाव असला तरी त्यातून आपली नकारात्मक मानसिकता आणि कमजोरी दिसून येत असते. आणि बहुतेकदा या तत्काळ प्रतिक्रियेतून त्या व्यक्तीचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.
याउलट प्रतिसाद देणारे म्हणजेच रिस्पॉन्ड करणारे यात नेहमी उजवे ठरत असतात. योग्य प्रतिसादातून व्यक्तिमत्त्वाचा एक आदर्श पैलू ते इतरांसमोर ठेवत असतात. समस्येवर विचार करणे, माहिती गोळा करणे, सल्ला घेणे आणि संयमाने त्या समस्येवर निराकरण करून प्रतिसाद देणे हिताचे ठरते. शांतचित्ताने, अचूक निर्णयक्षमतेने पण दृढ निश्चयाने संकटावर मात करणे म्हणजे योग्य प्रतिसाद देणे.प्रसिद्ध अमेरिकन लेखक आणि प्रेरणादायी वक्ता बॉब प्रॉक्टर प्रतिक्रिया आणि प्रतिसादावर सांगतात की, थहशपर्रूीे ठएअउर्ढूीे रीश सर्ळींळपस रुरूर्रूीीे िुेशी. थहशपर्रूीे ठएडझजछऊर्रूीे रीश ीींरूळपस ळप लेपीीेंश्र ेषरूीीीेशश्रष. म्हणजे जेव्हा आपण तत्काळ प्रतिक्रिया द्याल तेव्हा आपणच आपल्या सामर्थ्यापासून दूर जाल, पण जेव्हा आपण प्रतिसाद द्याल तेव्हा मात्र तुम्ही नियंत्रणात राहाल.
दैनंदिन जीवन जगताना प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक समस्या, अडचणी येत असतात. अनेकदा आव्हानांना आणि ताणतणावाला सामोरे जावे लागते. समस्या, आव्हाने, अडचणीरूपी अनेक झुरळे आपल्या अंगावर बसत असतात. या समस्यारूपी झुरळांना प्रतिक्रिया (रिऍक्ट) देऊन थयथयाट करत बसायचे की योग्य प्रतिसाद (रिस्पॉन्ड) देऊन त्यांना हाकलून द्यायचे हे शेवटी ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे.
सागर ननावरे