छे गं बाई, नको तो ग्रुप!’ धप्पकन कोचावर बसत ताई म्हणाली. आमच्या ताईचे, म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचे हे नेहमी असेच असते. घरात प्रवेश करता करता ती असे काही तरी वाक्य सोडून देते. काही आगापिच्छा नसलेले. तिच्या वाक्यातून ऐकणाऱ्याला काहीही बोध होत नाही. आताही “छे गं बाई, नको तो ग्रुप!’ या तिच्या वाक्यावरून काय बोध घ्यायचा हे काही कोणाच्या लक्षात येणार नाही? कोणता ग्रुप? व्हॉट्सऍपचा, फेसबुकचा, मेसेंजरचा… की आणखी कोणता? की महिला मंडळाचा एखादा ग्रुप? बचत गट-भिशीचा की आणखी कोणता? आणि तो का नकोसा झाला? हे सारे प्रश्न मलाही पडले.
पण मी तिला काही विचारले नाही. शांतपणे पाण्याचा ग्लास तिच्यासमोर टीपॉयवर ठेवला आणि समोर बसले. तिच्या मनात जी काही खळबळ आहे. जे काही विचार आहेत, ते ती सांगणारच होती. तिच्या पद्धतीने… तेव्हा उगाच अतिउत्साह वा उत्सुकता दाखवण्यात अर्थ नाही हे मला अनुभवाने चांगले माहीत होते. तसे तिचे सोशल ग्रुप पुष्कळ होते. बचत गटाचा ग्रुप होता, भिशीचे दोन-तीन ग्रुप होते, फेसबुकवर ती पाच-सहा ग्रुपची सदस्य होती. व्हॉट्सऍपवर तर चांगल्या डझनभर ग्रुपमध्ये होती ती. तिला संगीताची आवड आहे, लेखनाची आवड आहे, समाजसेवेची आवड आहे, कल्चरल म्हणतात तशा तिच्या ऍक्टिव्हिटी बऱ्याच असतात. त्या साऱ्यांशी संबंधित अनेक ग्रुपमध्ये ती सामील झालेली असते. आणि त्यापैकी बहुतेक ग्रुपमध्ये तिची भूमिका केवळ वाचकाची-प्रेक्षकाची अशी असते. आलेल्या पोस्ट वाचल्या तर वाचल्या, नाही तर तशाच डिलिट करून टाकल्या, अशी तिची सवय. आणि तसा त्यासाठी तिला मोकळा वेळ भरपूर असतो.
“मी बाई तो ग्रुप सोडून दिला आहे. म्हणजे लेफ्ट केला आहे.’ पाणी पिऊन ग्लास टीपॉयवर ठेवत ताईंने जाहीर केले. मी एक अक्षरही न बोलता केवळ प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहिले. तिनेही माझ्याकडे पाहिले. काय अडाणी मुलगी आहे. काहीसुद्धा कळत नाही असा दयार्द्र भाव तिच्या नजरेत होता. मी काही प्रतिक्रिया दाखवली नाही. तू पण ना… असे अपूर्ण वाक्य फेकत ती पुढे बोलू लागली. “”अगं, या आलतू फालतू ग्रुपचे सदस्य होऊन आपण आपला अमूल्य वेळ वाया घालवत असतो बघ.” तिचा वेळ अमूल्य असल्याचे ज्ञान मला नवीन होते.
आता नवीन वर्षाचा संकल्प म्हणून मी अगदी मोजक्या ग्रुपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सऍपचा तर मला अगदी कंटाळा येऊ लागला आहे. आता बघ, हा जो मी ग्रुप सोडणार आहे ना, त्यात जवळ जवळ सव्वाशे मेंबर्स आहेत. सगळे अगदी सुशिक्षित-नुसते सुशिक्षित नाही, तर उच्च शिक्षित आहेत. बुद्धिजीवी म्हणतात तसे आहेत. पण या ग्रुपमधील सव्वाशेपैकी जेमतेम आठ-दहांचाच त्यात ऍक्टिव्ह सहभाग असतो. बाकीचे नुसते वाचक-प्रेक्षक प्रतिक्रियाही न देणारे. आणि लिहिणारे जे पाच-दहा आहेत, त्यापैकी बहुतेक जण मी काय केले, हेच परत परत सांगत असतात. आणि त्यांच्या पोस्टना त्याच ठरावीक जणांच्या कौतुकाच्या प्रतिक्रिया असतात. त्याबाहेरच्या कोणी काही पोस्ट केली, तर तिच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा अशी पोस्ट चालेल का? असा कुजका प्रश्न ऍडमिनला विचारतात. सारा मूठभरांचा खेळ.
ती एक गोष्ट आहे ना, अहो रूपम अहो ध्वनिम… तसला प्रकार. माझ्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही. मी पुन्हा तिच्याकडे अज्ञानी बालकाची भूमिका घेत प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. ऐक, असे म्हणून ती सांगू लागली. आपल्याला कविता होती बघ शाळेत असताना, आठवते का? एकदा उंटाच्या घरी लग्न निघाले, सारे वऱ्हाड आले. गाढव गवयी मंगलाष्टके म्हणायला लागले, ताना मारू लागले. तेव्हा वा ऽऽ ऽ वा ऽऽ ऽऽ काय आवाज आहे-अशी उंट मंडळी त्यांची प्रशंसा करू लागली आणि नवरानवरीचा काय जोडा आहे, काय रूप आहे, अशी गायकमंडळी त्यांची प्रशंसा करू लागली. अनेकदा असा सारा अहो रूपम अहो ध्वनिम असा प्रकार असतो. तेव्हा असे ग्रुप सोडलेले बरे.
अमुक अमुकचे हे काम किंवा हे लेखन फार छान आहे. आवर्जून पाहा… वाचा… असे कोणी लिहिल्याचे मला आठवत नाही. त्यामुळे मी हा ग्रुप सोडणार आहे, नव्हे सोडला आहे. आणि नवीन वर्षात असे अनेक ग्रुप सोडण्याचा संकल्प केलेला आहे. विजयी नजरेने माझ्याकडे पाहात ताई म्हणाली. छान! अभिनंदन… नवीन वर्षाचा छान संकल्प आहे… असे म्हणून मी तिच्यासाठी चहा करायला उठले.
योगिता जगदाळे