मुंबई – मराठवाड्यातील विकासासाठी काय व्हिजन आहे हे बोलण्याऐवजी आमचे बंड कसे योग्य होते आणि सत्ताबदलाचे नाटय कसे रंगले, हे बोलण्यातच मुख्यमंत्र्यांनी पैठणच्या सभेत वेळ घालवला, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.
शिंदे गटाने जे कृत्य केले त्याला घटनात्मक मान्यता मिळालेली नाही. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडून घटनात्मक मान्यता मिळत नाही तोपर्यंत शिंदे सरकार असंविधानिक आहे. त्यामुळे विरोधक हे टीका करतच राहणार, असेही महेश तपासे यांनी सुनावले.
पैठण येथील सभेत राज्याला काय फायदा होणार किंवा मराठवाड्यातील विकासासाठी काय करणार हे सांगण्याऐवजी शिंदे यांनी अजित पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या टीकेचा धसका घेतल्याचेच स्पष्ट जाणवत होते असेही महेश तपासे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी कशी जमवण्यात आली याचे चित्र महाराष्ट्रासमोर आल्याचेही महेश तपासे म्हणाले.
दरम्यान, बंडखोरीचे कृत्य कसे योग्य होते आणि वस्तुस्थितीला धरून होते हे सांगण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला, मात्र जनता दुधखुळी नाही. महाविकास आघाडी फोडण्याचे जे कृत्य केले आहे त्यावरुन जनता तुमच्या 50 पैकी 45 आमदारांचा नक्की पराभव करणार, असा इशाराही त्यांनी दिला.