– मिलन म्हेत्रे
करोना काळात पुण्यातील बुहतेक गणेश मंडळांनी विधायक कार्य करून समाजभान राखल्याचे दिसून आले. मात्र, हेच समाजभान विसरल्याचे चित्र करोना काळ संपल्यावर झालेल्या परवाच्या गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत दिसून आले. आर्थिक गाडा आता हळूहळू पूर्वपदावर येत असताना करोना काळात केलेली काटकसर आणि त्यावेळी आरोग्योपचारासाठी झालेली आर्थिक परवड ही सार्वजनिक मंडळे पूर्णपणे विसरली. विसर्जन मिरवणुकीत डीजे, स्पीकरवर झालेला अनाठायी खर्च आणि त्यावेळचा धांगडधिंगा काय सिद्ध करून गेला, हा संशोधनाचा विषय आहे.
आर्थिकदृष्ट्या विचार करता या “साऊंड सिस्टिम’वरचे अर्थकारण विकोपाला गेलेले दिसून आले आहे. ध्वनिप्रदूषणाचे सर्व निकष या काळात धाब्यावर बसवले गेले आहेत. उच्चांकी ठरलेल्या या प्रदुषणासाठी उच्चांकी खर्चही केला गेला. कर्णकर्कश्शपणामुळेच डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. या व्यतिरिक्त असलेल्या ब्रॅण्डेड कंपन्यांच्या सिस्टिममध्ये स्थानिक पातळीवरही फेरफार करून त्या वापरल्या गेल्या आहेत. त्यामुळे आवाजाच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर घातक परिणाम दिसून आले आहेत.
या “सिस्टिम’मध्ये दोन बेस आणि दोन टॉपसाठी मिरवणूक सुरू झाल्यापासून संपेपर्यंत 80 हजारांपासून 3 लाख रुपयांपर्यंत भाडे आकारले गेले आहे. आवाजाच्या प्रतवारीनुसार आणि “सिस्टिम’च्या ब्रॅण्डनुसार हे भाडे आकारले जाते. याबरोबरच या साऊंड सिस्टिमसाठी आणि लाईटसाठी जनरेटरचा वापर केला जातो. हा जनरेटर 65 ते 125 केव्ही क्षमतेचा असतो. या जनरेटरचे भाडे याच कालावधीसाठी सुमारे 65 हजारांपर्यंत आहे. यात डीझेलचा खर्च घेतला जात नाही, तो मंडळाला वेगळा करावा लागतो. तो खर्च साधारण 10 हजारांपर्यंत जातो.
गणपतीची मूर्ती, साऊंड सिस्टिम आणि जनरेटर यासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीचा वापर करण्याची पद्धत आता रूढ झाली आहे. गणपती प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंत याचा वापर केला जातो. अनेक वेळा विसर्जनासाठी ट्रॅक्टर-ट्रॉली मिळणे मुश्कील होते. यासाठी आधीपासूनच दहा दिवस ही वाहने मंडळे आरक्षित करून ठेवतात. या ट्रॅक्टर-ट्रॉलीचे विसर्जनापुरते मर्यादित भाडे सुमारे 15 हजार असते. त्यात ट्रॅक्टर आणि एकाच ट्रॉलीचा समावेश आहे. यापेक्षा अधिक ट्रॉली हव्या असल्यास प्रत्येकी पाच हजार अधिक द्यावे लागतात.
एकूणच प्रत्येक मंडळाचे गणेशोत्सव सुरू झाल्यापासून विसर्जनापर्यंत मांडव, वीज, देखावा आणि हा वरील सर्व खर्च पाहता 5 ते 6 लाखांपर्यंत खर्च होत असतो. हा खर्च दिवसेंदिवस महामाईमुळे वाढतोच आहे. पुण्याचेच नाही तर आसपासच्या परिसरातील अर्थकारणही या उत्सवावर अवलंबून आहे. हा खर्च करण्यास काहीच आक्षेप नाही; पण देश-विदेशात पोहोचलेला गणेशोत्सव एक पवित्र, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून पोहोचला जावा, इतकीच माफक अपेक्षा पुणेकरांची आहे, हे नक्की.