मुंबई – अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील शेतकरी अडचणीत आले असताना मुख्यमंत्री धुळवड खेळण्यात दंग होते, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
नाफेडकडून अजूनही शेतमाल खरेदी सुरु नाही, सरकारकडून सभागृहाची दिशाभूल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारच्या संवेदना बोथट झाल्या आहेत, असा हल्लाबोल करत विरोधी पक्षाने सभागृहातून सभात्याग केला.
सरकारच्या वतीने सभागृहात करण्यात आलेले निवेदन अपुरे आहे. अनेक नुकसानग्रस्त भागांचा उल्लेख या निवेदनात नाही. राज्यातला शेतकरी हतबल असताना सरकारने बघू, करु अशी उत्तरे न देता शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
त्यापूर्वी अजित पवारांनी सांगितले की, राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस, गारपिटीनं उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. कापणीला आलेला गहू जमिनदोस्त झाला आहे, आंबा, काजू, द्राक्षे, केळी, संत्रा, लिंबू, पपई, कलिंगड यासारख्या अनेक फळपीकांबरोबरच हरभरा, तूर, मका, वाल, चवळी, पावटा व इतर रब्बी पालेभाज्या यांचंही नुकसान झालेलं आहे.
वीज अंगावर पडून जनावरं दगावली आहेत, मेंढ्यासुद्धा मृत पडल्या आहेत. शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे. आंबा, काजू सारख्या पिकांचा मोहोर व संत्रा, लिंबू यांची फळं गळल्यानं उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे.