पिंपरी – पोटनिवडणुकीत तुरुंगातून अनेक गुंडांना सोडवण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हॉटेलमध्ये जाऊन भेटीगाठी घेतल्या, याची माहिती आमच्याकडे असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. सरकारच्या आशीर्वादाने पुणे पिंपरी चिंचवडमधील गुंड सक्रिय होत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा वचक राहिला नाही. महाराष्ट्रात फडणवीस यांच्या कायदा सुव्यवस्थेवर धाक राहिला नाही. केवळ राजकारणात गुंतलेले असल्याची टीका दानवे यांनी केली आहे.
शिवसेनेच्या वतीने आकुर्डीत सोमवारी (दि.5) जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी दानवे म्हणाले की, भाजप आमदारच गोळीबार करतोय, ज्याला गोळ्या घातल्यात तोही धुतल्या तांदळाचा नाही. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र हे वर्ष बंगल्यावर पुण्यातील कुख्यात गुंडा भेटतात. त्यामुळे याचे उत्तर देखील तेच देतील. तपासणी करून आतमध्ये सोडले जाते, तरीही आशाप्रकारे गुंड जात असेल तर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुण्यातील गुंडांच उदात्तीकरण केले जात आहे. हे चुकीचं आहे. असे गुंड मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जात असतील तर हे राज्य गुंडांच आहे, अशी टीका दानवे यांनी केली. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. कोणी म्हणतं यांचा बॉस वर्षा वर आणि कोणी म्हणतं सागर बंगल्यावर बसलाय. हेच लोकांना गोळ्या घालतायत, जीव घेतायत, गुंडांच्या गळ्यात गळे घालत आहेत.
सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक
दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दानवे दानवे म्हणाले की, मराठा समाजाची या सरकारने फसवणूक केली आहे. म्हणूनच आज मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येते आहे. ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सुद्धा दानवे यांनी केला.