श्रीगोंदा – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ‘इतिवृत्ता’सह अन्य महत्वाचे ‘दफ्तर’ कार्यालयातून ‘गायब’ झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.५) उघडकीस आला. त्यामुळे ऐनवेळी नवे ‘इतिवृत्त’ आणून त्यात सभेच्या नोंदी करण्याची नामुष्की बाजार समिती प्रशासनावर ओढवली. दरम्यान, सचिव दिलीप डेबरे यांनीच हे दफ्तर पळविल्याचा गंभीर आरोप सभापती अतुल लोखंडे यांनी केला आहे.
सोमवारी (दि.५) बाजार समितीच्या संचालक मंडळाची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या निर्देशानुसार बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांना निलंबित करण्याचा विषय या बैठकीच्या अजेंड्यावर होता. या बैठकीला संचालक दत्तात्रय पानसरे, साजन पाचपुते, लक्ष्मण नलगे हे तिघे अनुपस्थित होते.
सचिव दिलीप डेबरे हेही बैठकीला गैरहजर राहिले. संचालक मंडळाच्या बैठकांचा वृत्तांत लिहिण्यासाठी वापरले जाणारे इतिवृत्त आणि अन्य काही महत्वाचे दस्तावेज कार्यालयातुन गायब असल्याचे ऐन बैठकीच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शोधाशोध करूनही ते न सापडल्याने अखेर नवे ‘इतिवृत्त’ आणून त्यात नोंदी करण्यात आल्या.
या बैठकीत सचिव दिलीप डेबरे यांना निलंबनाच्या कारवाईबाबत लेखी म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांचा ‘अल्टीमेटम’ देण्यात आला आहे. दरम्यान, बाजार समितीचे दफ्तर गहाळ झाल्याप्रकरणी रात्री उशिरा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची खात्रीशीर मिळाली. याबाबत सचिव दिलीप डेबरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
‘सचिवांनी’च दफ्तर पळविले – अतुल लोखंडे
सचिव दिलीप डेबरे यांनी कारवाईच्या भीतीने संस्थेचे ‘दफ्तर’ पळविले आहे. त्याबाबत कायदेशीर कारवाई करणार आहोत. मात्र, दफ्तर पळवून त्यांचा गैरकारभार झाकला जाणार नाही. त्यांच्यावरील कारवाई अटळ आहे.
– अतुल लोखंडे, सभापती, बाजार समिती