वाल्हे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यात तीव्र दुष्काळ जाणवत असून, दिवसेंदिवस वाढती उष्णता, दिवसेंदिवस कोंबडीच्या खाद्यात होत असलेली दरवाढ, पोल्ट्रीतील दगावतात असलेले पक्षी यामुळे चिकनच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून थंडीमध्ये 200 रुपये किलो असलेल्या चिकनचे दर 260 किलो झाले आहेत.
मागील काही वर्षांपासून मटणाचे भाव वाढल्याने मांसाहारप्रेमी चिकनकडे वळले होते. मात्र, आता चिकनचे भावही ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबाच्या आवाक्याबाहेर गेले असल्याने चिकनचे दुकाने ओस पडू लागली आहेत.
वाल्हे व परिसरात अनेक पोल्ट्री व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेत पोल्ट्री चालकांना कोंबड्या फेकून द्याव्या लागल्या होत्या. तर कित्येकांना फुकटात वाटप कराव्या लागल्या होत्या. मात्र, मागील दोन वर्षांपूर्वी हेच दर 110 ते 130 रुपये प्रती किलोपर्यंत होते. आता चिकनचे दर दुप्पट पेक्षा अधिक झाले आहेत.
खाद्याचे दर दुप्पट झाले असल्याने पक्ष्यांचा सांभाळ करण्यास 110 ते 120 रुपयांपर्यंत खर्च येतो; सध्या मार्केटमध्ये चिकनचा तुटवडा आहे. हॉटेल चालक, ग्राहकांकडून मागणी कायम आहे. मार्केटमध्ये आवक कमी आणि मागणी कायम असल्याने दर वाढत चालले आहे, अशी माहिती पोल्ट्रीचालक सत्यवान सूर्यवंशी, विनय पवार यांनी दिली.
जिवंत कोंबडी 160 रुपये प्रति किलो
पूर्वी 110 ते 120 रुपयांना मिळणारी जिवंत कोंबडी आज 160 रुपये प्रती किलो दराने खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे चिकनची 260 रुपये प्रती किलो दराने विक्री केले जात आहे. कोंबड्यांची संख्या कमी झाल्यामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गावरानच्या दरातही वाढ.
बॉयलर चिकनचे दर वाढत असताना दुसरीकडे गावरान चिकन (जिवंत कोंबडा) 650 रुपये किलो दराने विक्री होत आहे. तर डुप्लिकेट गावरान म्हणून संबोधले जाणारे जिवंत कोंबडे 500 रुपये प्रती किलो दराने विक्री होत आहे, अशी माहिती विक्रेते गोरख कदम, अहमद इनामदार यांनी दिली.
सामान्यांनी जगायचे कसे?
महागाईच्या वाढीमुळे अगोदरच बजेट कोलमडले आहे. भाजी, किराणा, यासारख्या गोष्टींना तोंड देताना नाकीनऊ येत आहे. उन्हाळ्यात चिकनचे दर कमी होतात. मात्र, यावर्षी चिकनचे दर दुपटीने वाढले आहेत. असेच आणखी दरवाढ झाली तर सामान्यांनी जगायचे कसे असा सवाल निर्माण होत आहे.
उन्हाळ्यात जत्रा- यात्रांचा सिजन असतो. मात्र, दरवर्षी चिकनचा बाजारभाव कमी असतो. यावर्षी मात्र, अजूनतरी जत्रा-यात्रा सुरू होण्याअगोदरच चिकनचे भाजारभाव वाढले आहेत. चिकनच्या वाढत्या बाजारभावामुळे चिकन विक्रीवर मोठा परिणाम होऊन, चिकन विक्री जवळपास निम्म्याने घटली असून दुकानातील मजूरांना दररोजची रोजंदारी मिळणेही शक्य होत नाही.- गोरख कदम, चिकन विक्रेते, वाल्हे