रायपूर – छत्तीसगडच्या निवडणुकीत बहुतांश एक्झिट पोलने काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवल्यानंतरही तेथे भाजपने अचानक मुसंडी मारत एकहाती विजय मिळवला. हा निकाल कॉंग्रेससाठी सर्वात धक्कादायक ठरला आहे. मुळात भाजपलाच आपल्या बाजूने या राज्यात इतका अंडरकरंट असल्याची कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांनीही या निकालाबद्दल आश्चर्यच व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. आमचा हा विजय अनपेक्षित असल्याचे भाजप नेते व माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनीही म्हटले होते.
२०१८ मध्ये मुख्यमंत्री झालेले बघेल हे गेल्या पाच वर्षांतील काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांपैकी एक म्हणून उदयास आले होते. त्यांना आणि कॉंग्रेसच्या बहुतांश नेत्यांना बहुमताची खात्री होती. आणि प्रत्यक्ष मतमोजणीतही सुरवातीचा बराच काळ कॉंग्रेसच आघाडीवर असल्याचे दिसत होते.
परंतु मतमोजणी जसजशी पुढे गेली तसे भाजपने आपले मताधिक्क्य वाढवत नेले आणि कॉंग्रेसवर मात केली. भाजपने ९० पैकी ५४ जागांवर विजय मिळवला आणि कॉंग्रेसला केवळ ३५ जागांवरच समाधान मानावे लागले. बघेल यांनी अतिशय आत्मविश्वासाने प्रचाराला प्रारंभ केला होता व पक्षातही चांगला एकोपा राखला होता. लोक त्यांना प्रेमाने `काका’ म्हणतात, आणि काका अभी जिंदा है ही सार्वजनिक भाषणांमधील बघेल यांची आवडती पंचलाइन होती.
सन २०१३ मध्ये छत्तीसगडमध्ये सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर बघेल यांना प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले त्यांनी आणि टी.एस .सिंगदेव यांनी पक्षाचे ठाणे मजबूत करीत मोठ्या बहुमताने सत्ता मिळवली. चांगल्या योजना राबवून राज्यालाही विकासाच्या मार्गावर नेले, पण ऐन निवडणूक काळात महादेव ॲपचे प्रकरण तापवण्यात आले.
कुरिअर व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला ईडीने अटक केली आणि त्याने आपण बघेल यांना ५०८ कोटी रूूपये दिल्याचा दावा ईडीकडे केल्याचे ईडीने प्रेसनोट काढून जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात या महादेव ॲप प्रकरणात स्वत: मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करून याच्याशी संबंधात पंधरा जणांना अटक करून त्यांची काही मालमत्ताही जप्त केली होती व या बेटिंग ॲपवर बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. पण भाजपने हा मुद्दा तापवून बघेल यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाची राळ उडवली. ईडीचा वापर करून राज्यातील कथित मद्य घोटाळ्याचे प्रकरणही भाजपे तापवले. या साऱ्याचा एकत्रित परिणाम कॉंग्रेसच्या हातून राज्य जाण्यात झाला.
यात विशेष नोंद घेण्याजोगी बाब अशी की मतदान प्रक्रिया संपल्यानंतर ज्या कुरिअरला बघेल यांना पैसे दिल्याच्या आरोपावरूनअटक करण्यात आली आहे, त्याने स्वत:च तुरूंगातून ईडीच्या प्रमुखांना पत्र पाठवूनआपण कोणालाही पैसे दिले नाहीत, उलट आपल्यालाच ईडीने खोटेपणाने गुंतवून आपल्याकडून हा इंग्रजी भाषेत खोटा जबाब नोंदवल्याचे म्हटले होते. आपल्याला इंग्रजी येत नाही असे असताना ईडीने आपल्याला एका इंग्रजी पत्रावर सही करण्याची जबरदस्ती केली असे त्याने या पत्रात म्हटले आहे. पण दरम्यानच्या काळात राज्यातील मतदान होऊन गेले होते व त्यात कॉंग्रेसला सत्ता गमवावी लागली.