कळीचा मुद्दा झाल्याने तावरे-पवार गटाला ठरणार तारक-मारक : सभासद कोणावर ठेवणार भरोसा?
बारामती -माळेगाव कारखान्याची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर आली असून कार्यक्षेत्रात विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात असल्याने वातावरण ‘तप्त’ झाले आहे. त्यातच माळेगावच्या निवडणुकीत छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा मुद्दा कळीचा झाला आहे. त्यामुळे हा मुद्दा दोघांसाठी 50-50 ठरणार असून हा मुद्दा तावरे की पवार गटाला मारक आणि तारक ठरणार हे सोमवारी (दि. 24) मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याची सद्यपरिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात आहे. सधा कारखान्यातील कामगारांचा पगार, भरतीप्रक्रिया, ऊसतोडणी मजूर नसणे आदी अनेक मुद्दे ऐन माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत समोर आल्याने माळेगावच्या सत्ताधाऱ्यांना आयतेच फावले आहे. तर विरोधक हे आरोप खोडून काढत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे खरे अन् खोटे कोण याबाबत सभासदांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्यात उच्चांकी दर माळेगाव कारखान्याचा आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या दिवशी हे सभासद कोणाला कौल देणार हे पाहणे उत्सुक्याचे आहे. माळेगाव कारखान्याची निवडणूक सत्ताधारी तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनल तर राष्ट्रवादी पुरस्कृत श्री नीलकंठेश्वर पॅनल यांच्यामध्ये चुरशी होणार आहे. या प्रचारात विविध मुद्दे समोर आल्याने ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ चंद्रराव व कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कसोटी मानली जात आहे.
शेतकरी विरुद्ध राजकारणी असा सामना
माळेगाव कारखाना ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी दिग्गजांची फौज कार्यक्षेत्रात उतरवली आहे. तर उलट तावरे गट पूर्णपणे शेतकऱ्यांवर विश्वास ठेवत शेतकऱ्यांचे सच्चे कैवारी असल्याचे निःक्षून सांगत आहे. त्यामुळे राजकारणी विरोधात शेतकरी अशीच ही निवडणूक. सध्या पवार गटाची बाजू सांभाळण्यासाठी छत्रपती व सोमेश्वर कारखान्याचे कारभाऱ्यांनी माळेगावच्या “रणा’त उडी घेतली आहे. त्यामुळे कारखाना सहकार संपवणाऱ्यांच्या (राजकारणी) म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताब्यात द्यायचा की शेतकऱ्यांच्याच ताब्यात ठेवायचा हे सभासदांनी ठरवायचे असल्याचे तावरे गटाचे म्हणणे आहे.