वाघळवाडी – येथील वन परिक्षेत्रात जिव्हाळा सोशल फाउंडेशनच्या वतीने मागील वर्षी 50 लिटरच्या सिमेंटच्या पाच टाक्या देण्यात आल्या होत्या. यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने व वन्यप्राण्यांची तहान भागवण्याकरिता या टाक्यांमध्ये पाणी सोडण्यात आले.
बुधवारी (दि. 19) फाउंडेशनच्या सदस्यांच्या वतीने या टाक्यांमध्ये टॅंकरद्वारे पाणी सोडण्यात आले.वाघळवाडी येथे शेकडो एकरांवर वनविभागाचे क्षेत्र आहे या ठिकाणी विविध पक्षी, चिंकारा जातीची हरण, ससा, तरस आदी वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असून उन्हाची तीव्रता वाढली असल्यामुळे नागरिकांसह पशु-पक्षी हैराण झाले असून पाण्यासाठी वणवण फिरत आहेत.
या पशु-पक्षी व प्राण्यांचा पाण्यामुळे मृत्यू होऊ नये यासाठी वनविभागातील या टाक्यांत पाणी सोडल्याने वन्यप्राण्यांची तहान भागणार आहे. यावेळी वनपरिमंडळ अधिकारी पी. एम रासकर, कर्मचारी नंदकुमार गायकवाड, योगेश कोकाटे, विठ्ठल जाधव, फाउंडेशनचे सदस्य प्रमोद फरांदे, संतोष धुमाळ, सागर रासकर, प्रथमेश किर्वे, हरिश विधाते, मंदार सणस आदी सदस्य उपस्थित होते.