Chhagan Bhujbal – मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange patil) यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. छगन भुजबळ हे पनौती आहेत त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल अशा तिखट शब्दांत जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली आहे. तसेच मंत्री गेल्यावरच शेतकऱ्यांचे चांगले होते असे काही नाही, असेही जरांगे यांनी म्हंटले आहे.
राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ आज नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहे. दरम्यान, भुजबळ यांच्या याच पाहणी दौऱ्याला मराठा आंदोलकांकडून कडाडून विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच सर्व घडामोडीवर मनोज जरांगे यांनी देखील प्रतिक्रिया देत भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान यावर बोलताना जरांगे म्हणाले की, जो माणूस कायदा पायदळी तुडवतो, महापुरुषांच्या जाती काढतो, जो शेतकऱ्यांच्या लेकरांच्या विरोधात आरक्षण देऊ नका म्हणून बोलतो, घटनेच्या पदावर बसून जातीमध्ये तेढ निर्माण करतो, त्यामुळे त्याने शेतात जायला नको पाहिजे.
उगाच त्या जमीनवाल्या शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल. हा माणूस पनौती असल्यासारखा आहे. तसेच, मंत्री गेल्यावरच शेतकऱ्यांचे चांगले होते असे काही नाही. प्रशासन आहे ना, प्रशासनाने पंचनामे करायला पाहिजेत. हा माणूस तिथे जाऊन पंचनामे करतो का?, असा सवालही जरांगेंनी विचारला.