मुंबई – राज्यात मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या राष्ट्रीय शिबिरास छगन भुजबळ अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले असून अजित पवार गटातही फूट पडल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यात तू-तू-मैं-मैं सुरू आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्याकरिता छगन भुजबळ आज, गुरुवारी येवला येथे आले होते. यावेळी भुजबळ यांच्या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला होता. यावर, ‘येऊ नका म्हणारे किती लोक आहेत आणि ज्यांना मी यावे असे वाटते ते किती लोक आहेत, हे बघावे लागेल’, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे.
ओबीसी आणि मराठा समाजात तणाव निर्माण झाला असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ यांनी ओबीसी एल्गार मेळाव्यात केलेल्या वादग्रस्त प्रक्षोभक विधानांचे पडसाद काल, बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. भुजबळ यांनी जपून वक्तव्ये करावीत. समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करणे टाळावे, अशी समज अजित पवार यांनी दिल्याचे सांगण्यात येते.
या सर्व घडामोडी एकीकडे सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कर्जत येथे दोन दिवसीय राष्ट्रीय शिबीर आजपासून सुरू झाले आहे. या शिबिरात अजित पवार गटाचे सर्व खासदार, आमदार, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पक्षाचा विस्तार आणि पुढील रणनीती निश्चित करण्यावर या शिबिरात भर देण्यात येत आहे. या शिबिराला दिग्गज नेते उपस्थित राहिलेले असताना, भुजबळ मात्र अनुपस्थित असल्याने तर्कवितर्क मांडण्यात येत आहेत.