मुंबई – कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम लढतीत झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा तोल ढळला होता. सामना हातातून निसटत आल्याचे लक्षात आल्यावर चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांच्या नावाने ड्रेसिंग रूममध्ये कोहलीने प्रचंड गोंधळ घातला. या दोघांच्या सुमार कामगिरीवरून त्याने आरडाओरडा करताना त्यांच्याशी गैरवर्तनही केल्याचे समोर आले आहे.
त्यामुळेच कोहलीच्या या गैरवर्तनावर संतापून या दोन्ही खेळाडूंनी थेट बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना फोन केला व कोहलीची तक्रार केली. कोहलीने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारताच्या टी-20 संघाचे कर्णधार पद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, असा निर्णय घेण्यामागचे खरे कारण आता समोर येत आहे.
आपल्यावर ताण येत असल्याने हा निर्णय घेतल्याचे कोहलीने सांगितले. मात्र, भारतीय संघांमधील काही वरिष्ठ खेळाडूंना कोहलीच्या नेतृत्वावर तसेच त्याच्या सहकारी खेळाडूंशी असलेल्या वर्तनामुळेच त्याच्याविरुद्ध मत बीसीसीआयचे तयार झाले होते व त्याची संघाच्या कर्णधार पदावरूनच नव्हे तर संघातूनही हकालपट्टी होण्याचीही शक्यता होती. त्यामुळेच कोहलीने हा निर्णय घेतला असल्याचे आता सांगतिले जात आहे. कोहलीच्या विरोधात रहाणे, पुजारा व नंतर अश्विन यांनी थेट शहा यांच्याकडेच तक्रार केली होती. त्यानंतर बीसीसीआयने या प्रकरणात हस्तक्षेप केला.
एकदिवसीय संघाचे नेतृत्वही जाणार
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर कोहली भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोडणार आहेच, पण आता या नवनव्या खुलाशांनंतर कोहलीचे एकदिवसीय संघाचे नेतृत्वही काढून घेतले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकारी तसेच निवड समितीचे सदस्य यांच्यात लवकरच एक बैठक होणार असून, त्यात कोहलीबाबत हा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.