ग्रामपंचायत प्रशासनाने रासायनिक पाण्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे- शिक्रापूर रस्त्यावरील मुरळ ओढ्याला पाण्यावरून पांढरा फेसाचा प्रकार सर्वांना दिसत आहे. नक्की कोणत्या कंपनीच्या रासायनिक द्रव्ये ओढ्याला सोडले जाते याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, या रासायनिक पाण्याची ग्रामपंचायत प्रशासनाने बंदोबस्त करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
तळेगाव ढमढेरे येथे झपाट्याने वाढत चाललेली रहदारी आणि औद्योगिक वसाहती आहेत. रहदारीतील प्रत्येक कुटुंबातील सांडपाणी वेळ नदीला सोडले जाते. याबाबत येथील ज्येष्ठ नागरिक कैलास नरके यांनी ग्रामपंचायत प्रशासनास याची सोय लावण्यासाठी पाठपुरावा केला होता. येथील मुरळ ओढ्याला सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याबरोबर कंपन्यांचे घातक रासायनिक द्रव्ये सोडले जाते, यामुळे पाण्याचे प्रदूषण होत आहेच त्याचबरोबर शेतीचे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या हवामानातील बिघडलेल्या वातावरणामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या आजाराचे उपचार घेण्यासाठी दवाखान्यात जावे लागत आहे. परिसरात लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत अनेकजण वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यामध्येच अश्या प्रकारच्या रासायनिक द्रव्ये ओढ्या नाल्याच्या सोडल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन यांनी उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिक होत आहे.
तळेगाव ढमढेरे येथील मुरळ ओढ्यातून वाहणारे पाणी हे औद्योगिक परिसरातून वाहत तळेगाव ढमढेरे येथे पिण्याच्या पाणीपुरवठा विहीरीत जाते. हेच पाणी पिण्यासाठी व वापरासाठी पुरविले जाते. फेसाळणाऱ्या पाण्यात केमिकल मिश्रण असेल तर याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊन रोगराईस आमंत्रण मिळू शकते. ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरीत या कंपन्यांस पत्र देऊन दक्षता घेण्यास सांगावे.
– श्रीकांत ढमढेरे ग्रामस्थ, तळेगाव