मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा ‘गहराइयां’ हा चित्रपट नुकताच 11 फेब्रुवारी 2022 रोजी वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य कारवा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केलं आहे. या चित्रपटात दीपिकाचे सिद्धांतसोबत अनेक किसिंग सीन असून, या दोघांची बोल्ड केमेस्ट्री दिसत आहे.
‘गहराइयां’ हा चित्रपट एक रिलेशनशिप ड्रामा असून, तरूणाईची स्वच्छंद जगण्याची उर्मी आणि यादरम्यानची नात्यांची गुंतागुंत हे सगळं चित्रपटात पाहायला मिळालं आहे. दरम्यान, याच नात्यातील फसवणूक आणि गुंतागुंती याबद्दल चित्रपटातील मुख्य अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने आपले मत व्यक्त केले आहे.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाला एक प्रश्न विचारण्यात आला होता. ‘फसवणूक ही आता खरीच तेवढी गंभीर बाब आहे का..? असा प्रश्न तिला विचारला. यावर दीपिका नेमकं काय म्हणेल, याकडे सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. “फसवणुकीला मी दुजोरा देत नाही. पण इतरांच्या नातेसंबंधांवर मी माझी वैयक्तीक मतं मांडावीत, असंही मला वाटत नाही. मग त्या नात्यात फसवणूक झाली असो वा नसो किंवा मग त्याबाबत ते सहमत असो वा नसो.
आपल्या नात्यामध्ये एकमेकांवरील विश्वास ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शारीरिक आकर्षण ही एक गोष्ट आहे, पण जर का भावनिक फसवणूक होत असेल तर मला जास्त वाईट वाटेल. पार्टनरची फसवणूक करत दुसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवणं ही फार गंभीर बाब नाही असं मी म्हणत नाही. पण भावनिक फसवणूक हे इतर कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपेक्षा अधिक त्रासदायक असतं. असं दीपिका म्हणाली. चित्रपट देखील दीपिका आणि सिद्धांत यांची केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे.